राजू वैद्य परवापर्यंत आमच्यासोबत होते, हे अनाकलनीय:प्रलोभनांच्या राजकारणावर अंबादास दानवे यांची टीका; मशाल यात्रेच्या माध्यमातून प्रचाराचा शुभारंभ

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नेते आणि विधानपरिषद माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय घडामोडींवर सविस्तर भाष्य करत सत्ताधारी पक्षांवर तसेच विरोधकांवरही निशाणा साधला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर, युतीचे राजकारण, कार्यकर्त्यांची भूमिका, तसेच सत्तेच्या प्रलोभनांबाबत त्यांनी स्पष्ट आणि परखड मत मांडले. विशेषतः ठाकरे गटाचे महानगर प्रमुख व माजी नगरसेवक राजू वैद्य भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, परवापर्यंत राजू वैद्य आमच्यासोबत होते. अचानक काय घडलं हे समजत नाही. ते एक सक्षम आणि चांगले कार्यकर्ते होते. पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. तरीही त्यांनी हा निर्णय का घेतला, हे अनाकलनीय आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावर भाष्य करताना दानवे यांनी स्पष्ट केलं की, प्रत्येक पक्षात काही ना काही अंतर्गत मतभेद असतात. मात्र उखाळ्या-पाखाळ्या काढण्यातून राजकीय संस्कृती सुधारत नाही. कोणत्या पक्षात मतभेद नसतात? पण त्यावर सार्वजनिक टीका करणे योग्य नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भाजपवर अप्रत्यक्ष टीका करताना त्यांनी पार्टी विथ डिफरन्स, म्हणवून घेणाऱ्या पक्षाकडे सक्षम कार्यकर्त्यांची कमतरता असल्याचं सूचक वक्तव्य केलं. सध्या प्रलोभनाचं राजकारण सुरू असून अनेकांना कंत्राटं देऊन राजकीयदृष्ट्या बाटवलं जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. कार्यकर्त्यांना पद, कामं, कंत्राटं याचं आमिष दाखवून फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे, असा दावा दानवेंनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या 2029 पर्यंत कुबड्यांची गरज नाही, या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दानवे म्हणाले की, आमच्या पक्षात कुणीही कुबडीवर उभा नाही. जर कुणी सहकारी कुबडी ठरतो असेल, तर माननीय पालकमंत्र्यांनी त्याचं नाव जाहीर करावं. या मुद्द्यावर त्यांनी भाजप नेतृत्वाला थेट आव्हान दिलं. नीलेश राणे यांनी घेतलेल्या सभांबाबत बोलताना दानवे म्हणाले की, कोणताही पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतो, सभा घेणं, प्रचार करणं ही राजकीय प्रक्रिया आहे. मात्र त्यामागे असलेला उद्देश जनतेसमोर स्पष्ट असायला हवा, असं त्यांनी सूचित केलं. शिवसेना आणि मनसे युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांवर दानवे यांनी ठाम भूमिका मांडली. शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत. यामध्ये कोणताही गुप्त अजेंडा नाही. सगळं पारदर्शक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. विविध पक्षांशी युतीच्या शक्यतांवर बोलताना त्यांनी सांगितलं की, भाजप आणि शिंदे गट वगळता इतर पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. काही पक्षांनी युतीसाठी तयारी दर्शवली आहे. एआयएमआयएम आणि अजित पवार गटानेही तयारी दर्शवली असल्याचं त्यांनी नमूद केलं. मात्र एआयएमआयएमसोबत युती केली जाणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. युती करताना विचारसरणी आणि स्थानिक परिस्थिती महत्त्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. संस्थान गणपती मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत बोलताना दानवे म्हणाले की, जर कोणी निर्दोष असेल तर त्यांची सुटका होण्यास हरकत नाही. न्यायव्यवस्था स्वतंत्र आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. आगामी काळातील पक्षाच्या हालचालींबाबत माहिती देताना त्यांनी सांगितलं की, 5 ते 11 जानेवारीदरम्यान मैदान बुक करण्यात आलं असून भव्य मशाल यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. संस्थान गणपती मंदिरात श्रीफळ फोडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला जाईल. या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करून जनतेपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवली जाईल, असा विश्वास दानवेंनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!