Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार?:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान; म्हणाले- NCP च्या भवितव्यावर तातडीने निर्णय घ्यावा लागेल

‘जनभावना, आमदारांची भावना आणि प्रफुल्ल पटेल म्हणून माझी भावना ही सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या जागेवर बसवायची आहे. याचा निर्णय पक्षाने करायचा आहे. याबद्दल आम्ही आज रात्री किंवा उद्या सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी बोलू. जनतेच्या भावनेरूपच निर्णय होईल, असे म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होतील,’ असे संकेत आज माध्यमांशी बोलताना दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचालींना वेग आला आहे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की, जनभावनेचा आदर लक्षात घेऊन लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे असल्याचे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘अजित पवारांकडे जी जागा होती, त्या जागेबद्दल निर्णय करावा लागणार आहे. अजित पवार यांच्या खात्याबाबत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित निर्णयांबाबत अनिश्चितता कायम राहू नये, अशी आमची भूमिका आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये असलेली अस्वस्थता आणि जनतेच्या भावना लक्षात घेता विलंब न करता ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आम्ही आमची भूमिका मांडली आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘अजितदादा हे अनुभवी नेते असून त्यांनी राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या खात्याबाबत लवकर निर्णय होणे हे केवळ पक्षासाठीच नव्हे, तर राज्याच्या प्रशासनासाठीही महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही स्पष्ट भूमिका ठरवली जावी, जेणेकरून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. येत्या काळात याबाबत लवकरच निर्णय होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘जनभावना, आमदारांची भावना आणि प्रफुल्ल पटेल म्हणून माझी भावना ही सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या जागेवर बसवायची आहे. मात्र, हा पक्षाचा निर्णय आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची आम्ही कुठलिही चर्चा केली नाही. योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे. त्या दिशेने आम्ही विचार करू. पण अजून असा विषय समोर आलेला नाही.’ प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ‘अजूनही राजकीय शोकय. आज तिसरा दिवसय. घरचे कार्यक्रम सुरूयत. आम्हाला सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांच्याशी बोलावं लागेल. आम्ही त्यांच्याशी बोलू. शक्य असेल, तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू. लवकरात लवकर ही जागा भरायचीय. मी पुन्हा सांगतोय. ही जनतेची भावनाय. त्याच्या अनुरूपच निर्णय होईल.’ दरम्यान, या भेटीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांच्या खात्याबाबत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार यांनी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांच्या निधनानंतर, त्यांच्याकडे असलेली खाती कोणाला मिळतील याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली, तसेच अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थ, क्रीडा आणि उत्पादन शुल्क ही तीन खाती कायम ठेवण्याची मागणीही करण्यात आली. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबतही या वेळी चर्चा झाली. दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी राजकीय सल्ल्यासाठी नरेश अरोरा यांना बारामतीला बोलावले आहे. नरेश अरोरा आज दुपारी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी बारामतीला येतील.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!