बार्शी सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयाने बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत दमदार एंट्री केली असून, यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. तर बार्शीच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असून, आता विधानसभेसाठी कोण? असा नवा प्रश्न समोर आला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर राऊत यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय केले. आगामी सर्व निवडणुका जिद्दीने लढण्याचा आत्मविश्वास दिला आणि याच टप्प्यापासून राऊत यांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली. राऊत यांनी जोमाने कामाला लागत बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. या विजयांमुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ राजकीय अपघात होता, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बार्शी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील वाढत्या प्रभावामुळे त्यांची राजकीय ताकद अधिक वाढली. हे यश भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या नजरेत भरण्याजोगे होते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सलग यश, पक्ष संघटनेवरील पकड आणि तालुक्यातील प्रभाव याच्या बळावर भाजपने त्यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली. महायुतीच्या संख्याबळामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, राऊत यांनी केवळ महायुतीची मते कायम राखली नाहीत, तर विरोधातील काही हक्काची मतेही आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. तब्बल ३६५ मतांच्या मताधिक्याने मिळालेला हा विजय पालकमंत्री गोरे व राऊत यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची साक्ष देणारा ठरला. या विजयाने राऊत यांचे स्थान केवळ बार्शीपुरते मर्यादित राहणार नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वजन वाढणार आहे. संपूर्ण जिल्हा हा त्यांचा मतदारसंघ असल्याने जिल्हाभर त्यांचा संपर्क वाढेल. राऊत यांच्यासमोर विकासकामांचे आव्हान विजयानंतर अपेक्षांचे ओझेही वाढले आहे. बार्शीतील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणणे, बार्शी व वैराग परिसरात नव्या औद्योगिक विकासाला चालना देणे, बार्शी शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे ही महत्त्वाची आव्हाने त्यांच्या समोर उभी आहेत. २०२९ च्या विधानसभेला कोण? आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू झाली आहे. येथील पारंपरिक राजकीय विरोधक सोपल व राऊत यांच्या कुटुंबातील नवे शिलेदार मैदानात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात नवा अध्याय विधान परिषद निवडणुकीतील विजयाने राजेंद्र राऊत यांनी केवळ राजकीय पुनरागमन केले नाही, तर बार्शी आणि जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे. पराभवाच्या नैराश्यातून उभारी घेत त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून, बार्शीसह जिल्ह्याच्या राजकारणाला आणि विकासाला ते नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
