Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

चर्चेत नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार?:फडणवीसांचा दावा फेटाळत शरद पवारांचा सवाल; अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का, यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्याआधी 17 जानेवारीला शरद पवार आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जयंत पाटील यांच्या निवासस्थानी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भात बैठक झाल्याचा दावा शरद पवार गटातील नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे. या दाव्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे नकार दिला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले होते की, दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार असत्या तर अजित पवार यांनी त्यांना याबाबत सांगितले असते. ते माझ्याशी सर्व गोष्टी शेअर करायचे, असा त्यांचा दावा होता. मात्र, या वक्तव्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेत या विषयावर ठोस प्रतिक्रिया दिली. त्यांच्या विधानामुळे या चर्चेला पुन्हा वेग आला आहे. शरद पवार यांनी प्रतिप्रश्न उपस्थित करत म्हटले, विलीनीकरणाच्या चर्चेत जे उपस्थित नव्हते, त्यांना बैठकीबद्दल काय माहिती असणार? या एका वाक्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दाव्यावर अप्रत्यक्षपणे सवाल उपस्थित केला. अजितदादा गटातील काही नेत्यांकडून मागील दोन दिवसांपासून अशा कोणत्याही चर्चा झाल्याचे नाकारले जात असताना पवारांचे हे विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. या घडामोडींमुळे शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा नवा राजकीय वाद उभा राहण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादींच्या भवितव्याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. जयंत पाटील यांच्या घरी बैठक झाल्याचा दावा एकीकडे, तर त्याचे खंडन दुसरीकडे, अशा विरोधाभासी भूमिकांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अजितदादा गटातील नेते विलीनीकरणाच्या चर्चांना नकार देत असताना शरद पवारांनी सूचकपणे बैठकीचा उल्लेख केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि अजितदादा गटाचे नेते काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवारांच्या विधानामुळे या चर्चेला नवे परिमाण मिळाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीला जाणार दरम्यान, शरद पवार हे मंगळवारी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला जाणार आहेत. दोन दिवस संसदीय कामकाजात सहभाग घेतल्यानंतर ते पुन्हा बारामतीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडेही राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. येणाऱ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाच्या चर्चांवरून सुरू झालेला हा वाद पुढे कोणत्या दिशेने वळतो, आणि त्याचा राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शरद पवारांच्या वक्तव्याने या विषयावर पुन्हा प्रकाशझोत पडला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!