नाशिक महापालिकेच्या महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणावाची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य केल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. या मुद्द्यावर थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. एका वाक्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण अचानक तापल्याचे चित्र आहे. नाशिक महापालिकेत भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. सत्तास्थापनेसाठी समन्वय साधण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या पदांवर वाटाघाटी होऊ शकतात, अशी चर्चा सुरू होती. मात्र, या प्रस्तावानंतर काही दिवसांतच मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपला कुबड्यांची गरज नाही, असे वक्तव्य करत स्पष्ट नाराजी व्यक्त केली. या वक्तव्याने शिवसेनेत संतापाची लाट उसळली. भाजपकडून आलेल्या प्रस्तावानंतर आता अशी भूमिका घेणे अनाकलनीय असल्याचा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपमध्येच समन्वयाचा अभाव आहे, अशी टीकाही करण्यात आली. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी या संबधीची नाराजी उघडपणे व्यक्त केली. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार स्वतः आमच्या पक्ष कार्यालयात आले होते. त्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला. आणि आता त्यांचे वरिष्ठ नेते ‘कुबड्या नको’ असे म्हणत आहेत. हा शब्दप्रयोग चुकीचा आहे, असे बोरस्ते म्हणाले. या घडामोडींमुळे मित्रपक्षांमधील विश्वासावर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे त्यांनी सूचित केले. बोरस्ते यांनी पुढे सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. शिंदे साहेब जो निर्णय देतील, तो आम्ही मान्य करू. त्यांनी विरोधी बाकावर बसण्यास सांगितले, तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड शिवसेनेने उपमहापौर, स्थायी समिती आणि अन्य महत्त्वाच्या पदांबाबत अपेक्षा व्यक्त केली होती. महायुती सत्तेत आल्यास आगामी निवडणुकांसाठी तिन्ही पक्षांना सोयीचे ठरले असते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण चित्र बदलल्याचे ते म्हणाले. आता परिस्थितीचा सविस्तर आढावा शिंदे यांना दिला जाणार आहे. या सगळ्या घडामोडींमुळे नाशिकमधील महापालिकेचे राजकारण तापले आहे. एका वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील तणाव उघड झाला आहे. पुढील काळात हा वाद कोणत्या दिशेने वळतो, आणि महापौर निवडणुकीच्या समीकरणांवर त्याचा काय परिणाम होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
