राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवारांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. सरकारकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास अतिशय संथ गतीने सुरू आहे. या प्रकरणी कुठेच काही होताना दिसून येत नाही. व्हीएसआर कंपनीही अजून सुरू आहे. विमानाचा ब्लॅकबॉक्स पाऊस, आग, उन व बॉम्बस्फोटांपासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही, असे ते म्हणालेत. दरम्यान, रोहित पवार उद्या पुन्हा पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडे आलेली नवीन माहिती सार्वजनिक करणार आहेत. रोहित पवारांनी आज येथील एका सेशन कोर्टात हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मी माझ्या ईडीच्या केसच्या बाबतीत आज सेशन कोर्टात आलो होतो. याच केसमध्ये अजित पवारांचीही केस आहे. ईओडब्ल्यूने प्रस्तुत प्रकरणात ईडीला सांगितले आहे की, या प्रकरणात कुठेच काही चुकीचे झाले नाही. त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. पण आश्चर्य पाहा ईडी काही हा विषय सोडत नाही. 13 फेब्रुवारीला अजित पवार जाऊन 15 दिवस झालेत. पण ईडीने राज्य सरकारविरोधात कोर्टात हा विषय उपस्थित करून आम्हाला या प्रकरणाचा तपास अधिक खोलात जाऊन करायचे असल्याचे सांगितले आहे. कोडे कधी – कधी सुटत नाही आता आम्ही आमचा विषय लढतोय. त्यात आमचाच विजय होईल असा आम्हाला विश्वास आहे. कितीही संघर्ष करावा लागला तरी आम्ही लढत राहू. पण विषय एवढाच आहे की, कोडे कधी – कधी सुटत नाही. आज जे लोक सत्तेत आहेत, त्यांचाही विषय ईडी सोडत नाही हा फार मोठा प्रश्न आहे. आम्हाला असे कळले आहे की, हा विषय 26 जानेवारीला दिल्लीला गेला होता, तेव्हा दिल्लीने या प्रकरणात जे कुणी नेते असतील त्यांना अजिबात न सोडण्याचे सांगितले. त्यावरून या प्रकरणी केंद्र व राज्य सरकारमध्ये विरोधाभास असल्याचे स्पष्ट होते. आम्ही विरोधात आहोत. आम्हाला संघर्ष करावाच लागेल. पण जे सत्तेत आहेत, त्यांची उद्या अडचण होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले. विलीनीकरण अन् राजकारण दुय्यम गोष्टी रोहित पवारांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांचे नाव सूचवणाऱ्या 35 आमदारांचे आभार मानले. तसेच अजित पवारांच्या अपघातावरही पुन्हा एकदा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, आमच्यासाठी विलीनीकरण व राजकारण या गोष्टी दुय्यम आहेत. आज अजित पवारांच्या बाबतीत प्रॉपर तपास होणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आमचा त्यावर फोकस आहे. आज आम्ही विलीनीकरणावर चर्चा करू शकतो. बैठका घेऊ शकतो. पत्रकार परिषदा घेऊन पुरावेही सादर करू शकतो. आमच्याकडे अख्खा फोन भरून मेसेज, व्हिडिओ तथा फोनवर काय बोलणे झाले याचे पुरावे आहेत. पण मी आज त्यावर बोलणार नाही. आमच्यासाठी हा विषय संपला आहे. मी उद्या ब्लॅकबॉक्ससह इतर मुद्यांवर सखोल पत्रकार परिषद घेणार आहे. ही पत्रकार परिषद आजच घ्यायची होती, पण आज आपल्या राज्यात परदेशातले व देशातले एक मोठे नेते येथे आलेत. आम्ही पत्रकार परिषद घेतली तर त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले असते. त्यामुळे आम्ही ही पत्रकार परिषद उद्यापर्यंत लांबणीवर टाकली आहे. सरकारकडून अजित पवारांच्या अपघाताचा अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. या प्रकरणी कुठेच काही होताना दिसत नाही. व्हिएसआर कंपनी अजूनही ऑपरेशनमध्ये आहे. आम्ही ज्या – ज्या गोष्टी प्रेडिक्ट केल्या होत्या, त्या – त्या सर्व होताना दिसून येत आहेत. ब्लॅकबॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही उद्या ते (सरकार) म्हणतील की, विमााचा ब्लॅकबॉक्स बंदच आहे, जळालाच आहे, तो तपासासाठी भारताबाहेर पाठवावा लागेल. सरकारकडून या तपासाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामु्ळे आम्ही या प्रकरणी काही अधिकची माहिती मिळते का ते पाहत आहोत. विमानाचा ब्लॅकबॉक्स हा पावसापासून उन्हापासून, आगीपासून, बॉम्बब्लास्टपासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. आता यात काय राजकारण सुरू आहे हे आपल्याला पहावे लागेल. खोलात जावे लागले. उद्या या डिटेलमध्ये जाऊन कोणत्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत त्या आपल्यापुढे मांडल्या जातील, असे रोहित पवार म्हणाले. अपघातावर पार्थ, सुनेत्रा पवारांना काय वाटते? अजित पवारांच्या अपघातावर सुनेत्रा व पार्थ पवार यांचे काय म्हणणे आहे? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीने रोहित पवारांना विचारला. त्यावर ते म्हणाले, अपघात झाल्यानंतर याविषयी माझी सुनेत्रा पवार व पार्थ पवार यांच्याशी चर्चा झाली होती. आता 13 दिवस झाल्यानंतर ते त्यांचे राजकारण करत आहेत. आम्ही आमचे समाजकारण करत आहोत. अजित पवारांच्या तेराव्यानंतर मी त्यांना भेटलो नाही.