भाजप नेते प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंच्या भेटीआधी धमकीचा फोन:हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याने दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यांनी 30 मेपासून अंतरवली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना उपोषण न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना थेट अंतरवलीत येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं. प्रसाद लाड यांनीही ही विनंती स्वीकारत आज भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना धक्कादायक प्रकार घडला. लाड यांच्या पीएला आधी धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच दोन जणांनी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी संशयितांना अडवत चौकशी केली असता ते निवेदन देण्यासाठी आल्याचं सांगत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आणखी एक संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाबाबत स्वतः प्रसाद लाड यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तर एक जण फरार आहे. हे लोक हॉटेलच्या परिसरात आले होते. पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी निवेदन द्यायला आल्याचं सांगितलं. मात्र त्यांची हालचाल संशयास्पद होती. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या घटनेनंतर पोलिसांनी हॉटेल परिसरात सुरक्षा वाढवली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!