Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भिवंडीच्या महापौरपदी नारायण चौधरी:काँग्रेसने भाजपला धक्का देत घेतला ‘चंद्रपूर’चा बदला; चौधरींना 48, भाजपच्या स्नेहा पाटलांना 16 मते

भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. या प्रकरणी आज झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यांच्या निवडीमुळे भाजपला जोरदार झटका बसला असून, काँग्रेसने ‘चंद्रपूर’चा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने सुरुवातीला भिवंडीच्या महापौरपदासाठी नारायण चौधरी यांचे नाव निश्चित केले होते. पण त्यानंतर अचानक स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. भाजपच्या या निर्णयामुळे नारायण चौधरी व त्यांचे सहकारी नगरसेवक नाराज झाले होते. चौधरी यांनी या प्रकरणी उघड नाराजी व्यक्त करत आपल्या 8 समर्थक नगरसेवकांपासून काँग्रेसला जाऊन मिळाले. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना नारायण चौधरींच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, आज दुपारी झालेल्या निवडणुकीत चौधरी यांना तब्बल 48 मते मिळाली. चौधरींना काँग्रेस, शरद पवार गटाचा पाठिंबा यासंबंधीच्या माहितीनुसार, स्व. विलासरावजी देशमुख सभागृहात दुपारी 12 वा. निवडणुकीला सुरुवात झाली. त्यानंतर हात वर करून झालेल्या मतदानात नारायण चौधरी यांना 48 मते मिळाली. यात काँग्रेसच्या 30, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 नगरसेवकांचा समावेश आहे. महापौरपदासाठी एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यात चौधरी यांचे 2 अर्ज होते. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यात कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास पाटील पोलिस एस्कॉर्टने येत असल्यामुळे वेळ वाढवून देण्याची मागणी झाली. पण पिठासीन अधिकाऱ्यांनी प्रक्रिया थांबवण्यास नकार दिला. अखेरीस 6 उमेदवारांनी माघार घेतली आणि स्नेहा पाटील (भाजप), नारायण चौधरी (सेक्युलर फ्रंट समर्थित) आणि विलास पाटील (शिंदे गट) अशी तिरंगी लढत झाली. त्यात नारायण चौधरी यांना 48, तर भाजपच्या स्नेहा पाटील यांना अवघी 16 मते पडली. शिंदे गटाच्या विलास पाटलांना 25 मतांवर समाधान मानावे लागले. कुणाला किती पडली मते? उपमहापौरपदी काँग्रेसचे तारिक मोमीन भिवंडीच्या उपमहापौरपदासाठीही तिरंगी लढत झाली. त्यात काँग्रेसच्या तारिक मोमीन यांना सर्वाधिक 43 मते मिळाली. तर शिंदे गटाच्या जावेद दळवी यांना 25 मते, तर भाजपच्या सुहास नकाते यांना 21 मतांवर समाधान मानावे लागले. या निकालाने भिवंडीत काँग्रेसने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. उपमहापौर निवडणुकीच्या सुरुवातीलाच कोणार्क विकास आघाडीचे मयुरेश पाटील यांना मोठा धक्का बसला. सपच्या नगरसेविका शबाना अंसारी यांनी मयुरेश पाटील यांच्या अर्जावर ‘सूचक’ आणि जावेद दळवी यांच्या अर्जावर ‘अनुमोदक’ म्हणून स्वाक्षरी केली होती. एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळ्या उमेदवारांसाठी ही भूमिका घेतल्याने छाननी प्रक्रियेत मयुरेश पाटील यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. यामुळे स्पर्धेत जावेद दळवी बाजूला पडले. ऐनवेळी समीकरणे बदलली उल्लेखनीय बाब म्हणजे भाजपने नारायण चौधरी यांना महापौरपदाच्या उमेदवारीचा शब्द दिल्यानंतरही त्यांनी ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या चौधरी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘सेक्युलर फ्रंट’सोबत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने त्यांना महापौरपदासाठी अधिकृत पाठिंबा देत व्हीप जारी केला. दुसरीकडे भाजपने स्नेहा पाटील यांच्यासाठी, तर शिवसेना (शिंदे गट) कडून विलास पाटील यांच्यासाठी व्हीप काढण्यात आला. शिंदे गटाचे उमेदवार विलास पाटील न्यायालयीन कोठडीत असल्याने सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला. काँग्रेसचा ‘चंद्रपूर’चा बदला पूर्ण काँग्रेसने भिवडी – निजामपूर महापालिकेत नारायण चौधरी यांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त केली. या माध्यमातून काँग्रेसने चंद्रपूर महापालिकेत भाजपने केलेल्या दगाफटक्याचा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजपने दिले कारवाईचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या प्रकरणी नारायण चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाचा व्हिप डावलणाऱ्या नगरसेवकांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणालेत.​भाजप आमदार महेश चौगुले यांनीही चौधरी यांच्यासह बंडखोरांवर ‘व्हीप’ उल्लंघनांतर्गत शिस्तभंगाच्या कारवाईचे संकेत दिलेत. त्यांच्या या इशाऱ्यानंतर भाजप या प्रकरणी कोणती भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोण आहेत नारायण चौधरी? नारायण चौधरी यांचा दूध व्यावसायिक ते महापौर व्हाया बिल्डर हा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. नारायण चौधरी हे मूळचे भिवंडीच्या ताडाली परिसरातील रहिवासी आहेत. ते तिथे सुरुवातीला दुधाचा व्यवसाय करत होते. त्यानंतर त्यांनी बांधकाम व्यवसायात पदार्पण केले. हा व्यवसाय करताना त्यांनी राजकीय क्षेत्रातही कार्य करणे सुरू ठेवले. नारायण चौधरी यांनी 2002 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. ते 2002 मध्ये सर्वप्रथम नगरसेवक बनले. त्यांनी 2007 पर्यंत भिवंडी विकास आघाडीचे नगरसेवक म्हणून काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून आपला वेगळा ठसा निर्माण केला. 2012 मध्ये ते समाजवादी पक्षात गेले. 2012 ते 2017 मध्ये त्यांच्या पत्नी अलका चौधरी सपच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. 2017 मध्ये नारायण चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पण नंतरच्या राजकीय घटनाक्रमानंतर त्यांनी 2025 मध्ये भाजपत प्रवेश केला. 2 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ते पुन्हा नगरसेवक म्हणून भिवंडी महापालिकेत पोहोचले. यंदा त्यांना भाजपने उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी भाजपने महापौरपदाची उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी सेक्युलर फ्रंटकडून महापौरपदासाठी अर्ज दाखल केला.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!