शिवयोग मंदिर व कोप्पळमधून तावून‎सुलाखून निघालेले महास्वामीजी सोने‎:अणदूरमध्ये पट्टाभिषेक सोहळ्यानिमित्त शिवकथा कार्यक्रमात आशीर्वचन‎

प्रतिनिधी | अणदूर येथील मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर अणदूर सदभक्तांच्या इच्छेनुसार व रंभापुरी जगदगुरूंच्या आज्ञेने येथील श्री निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती झाले. गेल्या २५ वर्षांत त्यांनी धार्मिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहेच. मात्र आज हजारो उपस्थित सद्भक्त ही त्यांची खरी संपत्ती आहे. शिवयोग मंदिर व कोप्पळ या धर्मसंस्कार केंद्रातून तावून सुलाखून निघालेले हे सोने आहे अशा शब्दात राजेश्वर महास्वामीजी तडवळा यांनी येथील निलकंठेश्वर मठाचे मठाधिपती शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या त्रिवेणी महोत्सवातील शिवकथा कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. येथील कै. सि. ना. आलुरे गुरुजी सभामंडपात शनिवारी (दि. १६) रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे नेतृत्व महास्वामीजी तडवळा, सुतरेश्वर शिवाचार्य महास्वामीजी अचलेर यांच्यासह महोत्सव अध्यक्ष मधुकरराव चव्हाण,सरपंच रामचंद्र आलुरे, माजी सरपंच धनराज मुळे, तंटामुक्त अध्यक्ष कल्याणी मुळे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीमंत मुळे,डॉ.अशोक चिंचोले आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी जेवळीचे माजी सरपंच मोहन पनुरे, उपसरपंच बसवराज कारभारी, माजी सरपंच मल्लिनाथ डिग्गे, यात्रा कमिटी अध्यक्ष महादेव मोघे यांची उपस्थिती होती. यावेळी सर्व महास्वामीजी व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महोत्सव अध्यक्ष मधुकरराव चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. हजारो हातांनी मंगलाष्टकांचा वर्षाव या वेळी शिवकथाकार पंडित हरिहरानंद स्वामी यांनी भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह हा अत्यंत पवित्र आणि आदर्श विवाह मानला जातो. या विवाहातून प्रेम,तपश्चर्या,संयम , निष्ठा हा संसारातील आदर्श असल्याचे सांगितले. या शिवकथेत आलेल्या भगवान शंकर व पार्वती विवाह सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. या वेळी शिव-पार्वती विवाह सोहळ्याच्या निमित्ताने मंगलाष्टका तसेच हजारोंच्या हाताने अक्षदा टाकण्यात आल्या आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.

Leave a Comment

error: Content is protected !!