राज्यातील टपाल कार्यालय पासपोर्ट कार्यालय सायनॉईड विषारी वायू मिश्रीत आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार असल्याचा ईमेल बुधवारी (ता. 25) टपाल कार्यालयास प्राप्त झाला असून त्यामुळे बहुतांश ठिकाणी टपाल कार्यालयातील कामकाज बंद करून तपासणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. सदर ईमेल कोणत्या भागातून आला याचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील टपाल कार्यालयांना आज ईमेल प्राप्त झाला आहे. ‘तुमच्या राज्यातील सर्व पासपोर्ट व टपाल कार्यालयात दुपारी बारा वाजून 10 मिनीटांनी सायनाईड विषारी वायू मिश्रीत 16 आरडीएक्स बॉम्बचा स्फोट होणार आहे. सर्वांना तातडीने बाहेर काढा’, असे या ईमेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. या ईमेलमुळे राज्यातील बहुतांश टपाल कार्यालयातून एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून काही ठिकाणी पोलिसांकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पासपोर्ट कार्यालयाची बाँम्ब शोध व नाशक पथकाकडून तपासणी केली जात असून तसेच पार्सलचे बॉक्स तपासले जात आहेत. राज्यभरात तपासणी सुरु असल्याचे हिंगोलीचे पोस्टमास्तर एस. एस. निर्मल यांनी सांगितले. हिंगोली कार्यालयाला माहिती मिळताच पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, पोलिस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, शेख मुजीब, संतोष करे, गणेश लेकुळे, गणेश वाबळे, संजय मार्के यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी पोस्ट ऑफीस परिसरात बॅांम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणीचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर ई मेल कोणत्या ठिकाणावरून आला याची चौकशी केली जात आहे. हिंगोलीच्या नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांनी केले आहे.
