शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधत मुंबईकर मतदारांना मुंबई आपल्याच म्हणजे मराठी माणसांच्याच ताब्यात ठेवण्याचे आवाहन केले. मुंबई आपली आहे, तिला आपल्याच ताब्यात ठेवा. आता चुकाल तर मुंबईला मुकाल, असे ते म्हणाले. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून मला आपलाच विजय असल्याची खात्री पटली आहे. पण गेल्या एक-दोन दिवसांत पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू झाल्यामुळे सावधगिरी बाळगा, असेही ठाकरे यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई विमानतळ परिसरातील शिवसेनेच्या शाखांना भेटी दिल्या. त्यात त्यांनी आपल्या उमेदवारांसह कार्यकर्त्यांना मतदानाच्या दिवशी व नंतर काय काळजी घ्यायची? यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर करण्याचा आरोप केला. तसेच निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वासही व्यक्त केला. ते म्हणाले, गत निवडणुकीत येथील आमच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला होता. पण यावेळी त्यांचा दणदणीत विजय होणार हे निश्चित आहे. गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी विजय हवा ते पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कसे जगायचे? हे शिकवले. पण शिवाजी महाराजांचा झाकलेला पुतळा पाहून आपण ही निवडणूक कुणाविरोधात लढवत आहोत हे दिसून येत आहे. आज आपल्या दैवतांचे पुतळे झाकले जात आहेत. आपली अस्मिता मारण्याचा प्रयत्न होत आहे. आपल्याला भाषेवर आक्रमण होत आहे. मग आता तुम्ही विचाराल आपल्या विरोधात कोण आहे? आपल्या विरोधात कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. तो गद्दार आहे हा भाग वेगळा. पण ती जी वृत्ती आहे, ही वृत्ती गद्दारीची आहे. मला या गद्दार वृत्तीचा पराभव करण्यासाठी मला येथील माझ्या उमेदवारांचा विजय हवा आहे. दोन दिवसांपासून पैशांचा धुमाकूळ उद्धव म्हणाले, निवडून आलेले गद्दार होऊ शकतात. पण जे निवडून देतात ते गद्दार होऊ शकत नाहीत ही दाखवून देणारी ही निवडणूक आहे. तुमच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहून मला आपलाच विजय आहे याची खात्री पटली आहे. मात्र गेल्या एक-दोन दिवसांपासून पैशांचा अक्षरशः धुमाकूळ सुरू आहे. हे एवढे निर्लज्ज व गद्दार लोक आहेत की, त्यांनी ठाण्यातील आपल्या व मनसेच्या उमेदवारांना 5-5 कोटींचे आमिष दाखवले होते. त्यांनी त्यांच्यापुढे उमेदवारी मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. आम्ही आमची कामे घेऊन मतदारांना सामोरे जात आहोत. याऊलट ते पैशांचे आमिष दाखवून आमच्या उमेदवारांना माघार घेण्याचा इशारा देत आहे. यावरून त्यांनी आपल्या काळात कोणतेही काम केले नसल्याचे स्पष्ट होते. काम केले असते तर त्यांच्यावर असे करण्याची वेळच आली नसती. पैसे वाटणाऱ्यांचे बेलाशक काय करायचे ते करा उद्धव ठाकरे म्हणाले, भाजप व शिंदे गटाकडे सांगण्यासारखे काही नाही, पण वाटण्यासारखे बरेच काही आहे. आता त्यांना पैसे वाटतानाही पराभवाची भीती वाटत आहे. आजची रात्र व उद्याची रात्र कुणी पैसे वाटताना दिसला, तर बेलाशय काय करायचे ते करा. मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला समजले असेल. संबंधिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या. आता हे हजार दोन हजार रुपये वाटत असतील, पण तुम्ही तुमचे आयुष्य विकू नका. आता कर्तव्याला चुकू नका. आता जर चुकाल, तर मुंबईला मुकाल. ही मुंबई आपली आहे. आपल्या ताब्यात ठेवा. तुम्ही ती ठेवाल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.
