Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

परळी हादरणार?:मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा; महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी नावं समोर येण्याची शक्यता, हत्येचा तपास निर्णायक वळणावर

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी तहसील कार्यालयासमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परळी हादरून गेली होती. त्या दिवसापासून मुंडे कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सुरुवातीला या मृत्यूबाबत विविध तर्कवितर्क लावले गेले; मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचा ठाम आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात नवनवीन घडामोडी समोर येत असून तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती मिळत आहे. या हत्येच्या तपासासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली होती. तपासादरम्यान संशयितांची नार्को चाचणी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी या दोन्ही तांत्रिक चाचण्यांचे अहवाल अधिकृतपणे विशेष तपास पथकाकडे सुपूर्द करण्यात आल्याचे समजते. या अहवालांमधून अनेक महत्त्वाचे धागेदोरे समोर आले असून प्रकरणातील गूढ उकलण्यास मदत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना खळबळजनक विधान केले. महादेव मुंडे हत्या प्रकरणात अशी काही धक्कादायक नावे पुढे येतील की संपूर्ण परळी हादरून जाईल, असा दावा त्यांनी केला. तपास अंतिम टप्प्यात असून अहवाल न्यायालयासमोर सादर झाल्यानंतर अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ही कायदेशीर प्रक्रिया आहे. अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात मांडला जाईल आणि त्यानंतर पोलिस काही नावे जाहीर करतील. मलाही काही नावे माहिती आहेत; परंतु तपासात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मी ती नावे सध्या सांगणार नाही, असे स्पष्ट शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मोठी आणि प्रभावशाली नावे समोर येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे परळीमध्ये राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे. महादेव मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीपासूनच या प्रकरणात राजकीय लागेबांधे असल्याची चर्चा होती. कुटुंबीयांनी सातत्याने निष्पक्ष तपासाची मागणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने विशेष तपास पथक स्थापन केले होते. आता नार्को आणि मेंदू नकाशा चाचण्यांचे अहवाल तपास यंत्रणेकडे आल्यामुळे सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात स्वतः लक्ष घातल्याचे सांगितले जात असून तपास वेगाने पुढे नेला जात आहे. अहवालांमुळे कोणाचे पितळ उघड पडणार आता सर्वांचे लक्ष या तांत्रिक अहवालांवर आहे. या अहवालांमुळे कोणाचे पितळ उघड पडणार, कोणावर कारवाई होणार आणि मुंडे कुटुंबाला न्याय कधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. तपास यंत्रणेला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून माहिती असूनही ती उघड न करण्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. पुढील काही दिवसांत न्यायालयीन प्रक्रियेनंतर या प्रकरणातील सत्य बाहेर येण्याची शक्यता असून परळीकरांचे लक्ष आता या तपासाच्या निकालाकडे लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!