आखाती देशात युद्धाचा भडका:परदेशात महाराष्ट्राचे हजारो नागरिक अडकले; विमानसेवा कोलमडली, पर्यटन बुकिंगवरही परिणाम

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनेई मारले गेल्याने आखाती देशांत युद्धाचा वणवा पेटला आहे. इराणने प्रत्युत्तरादाखल दुबईसह सहा देशांतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा फटका महाराष्ट्रातील पर्यटकांना, विद्यार्थ्यांना आणि भाविकांना बसला असून, दुबईसह विविध देशांत राज्याचे शेकडो नागरिक अडकून पडले आहेत. यासोबतच पर्यटन बुकिंगवरही याचा परिणाम झाला आहे. इराण – अमेरिका संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली आहे. एकट्या महाराष्ट्रात पर्यटनाचे ९९ टक्के बुकिंग रद्द झाले असून पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत देशातील १०० उड्डाणे रद्द करण्यात आली, ज्यात ६२ येणारी आणि ४२ जाणारी विमाने होती. ‘राजा राणी ट्रॅव्हल्स’चे संचालक विश्वजीत पाटील यांनी सांगितले की, जवळपास ९० टक्के लोकांनी भीतीपोटी आपली परदेश वारी रद्द केली आहे. जिल्हानिहाय अडकलेले नागरिक आणि स्थिती नाशिक: २०० भाविक संकटात मक्केला गेलेले नाशिकचे सुमारे २०० भाविक सध्या अडकले आहेत. जिद्दा विमानतळ बंद असल्याने यात्रेकरू मायदेशी परतू शकत नाहीत. फारूक तांबोळी यांच्यामार्फत गेलेले ३५ जणही मक्केत आहेत, ते सर्व सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. जळगाव: ३१ जण हॉटेलमध्ये बंदिस्त विमा कंपनीच्या कार्यक्रमासाठी गेलेले जळगाव जिल्ह्यातील ३१ नागरिक दुबईत अडकले आहेत. हल्ल्यामुळे पर्यटन स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. दुर्गेश चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशासन आणि हॉटेलकडून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड: ४० ज्येष्ठ नागरिक अडकले पिंपरीच्या माजी नगरसेविका सुमन नेटके यांच्यासह ४० ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप २७ फेब्रुवारीपासून दुबईत आहे. विमान सेवा बंद असल्याने हा ग्रुप अडकला असून, त्यांचे नातेवाईक चिंतेत आहेत. तसेच यवतमाळची विद्यार्थिनी जागृती जाधव ही सुद्धा १ मार्चला परतणार होती, पण विमान रद्द झाल्याने अडकून पडली आहे. लातूर, धाराशिव आणि उमरगा: विद्यार्थ्यांची धास्ती लातूरची नेहा मिसार ही विद्यार्थिनी दुबईत ‘रोबोटिक इंजिनिअरिंग’साठी गेली असून, तिच्यासह धाराशिव, नाशिक आणि पुण्याचे २५ ते ३० विद्यार्थी अडकले आहेत. उमरग्याचे माजी मुख्याध्यापक शिवानंद दळगडे आणि माशाळकर हे दांपत्यही दुबईत असून तेथील वीजपुरवठा खंडित झाल्याने संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. दुबईतील भारतीयांचा संदेश: “आम्ही सुरक्षित” दुबईत नोकरीसाठी गेलेले भारतीय नागरिक तानाजी गोरड यांनी सांगितले की, “सध्या दुबईतील स्थिती नियंत्रणात असून आम्ही सुरक्षित आहोत. मात्र, खबरदारी म्हणून प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत.” नातेवाईकांची ‘विशेष विमाना’ची मागणी अडकलेल्या नागरिकांचे नातेवाईक प्रचंड तणावाखाली असून, केंद्र सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून ‘विशेष विमाना’द्वारे भारतीयांना मायदेशी सुखरूप आणावे, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!