अंबरनाथ अन् अकोटमधील युतीबाबत भाजपला विचारा:त्यांचे नेते विस्तृतपणे सांगू शकतील, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया

नाशिक दौऱ्यावर असलेल्या खासदार श्रीकांत शिंदे यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा शंखनाद केला. यावेळी त्यांनी अंबरनाथ आणि अकोटमधील भाजपच्या ‘अजब’ युतीवर आपली भूमिका स्पष्ट करत भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. अकोटमध्ये एमआयएम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपने युती का केली? याचे उत्तर भाजपचे नेतेच अधिक विस्तृतपणे देऊ शकतील. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा काँग्रेसला विरोध होता, आहे आणि पुढेही तीव्र राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. एका बाजूला भाजप देशभर काँग्रेसविरोधी आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता मिळवण्यासाठी विरोधी विचारधारांच्या पक्षांशी थेट हातमिळवणी केली जात असल्याचे समोर आले. अंबरनामध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत सत्ता स्थापन करणे अपेक्षित होते. पण भाजपने शिवसेना शिंदे गटाला बाजूला ठेवून काँग्रेससोबत हातमिळवणी केली. तर अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये एमआयएमशी आघाडी केली आहे. या घडामोडींमुळे पार्टी विथ डिफरन्स, अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या भाजपने सत्तेसाठी आपल्या राजकीय तत्त्वांनाच मुरड घातली आहे का? असा सवाल पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नेमके काय म्हणाले श्रीकांत शिंदे? अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) बाजूला ठेवून काँग्रेसशी युती केली, तर अकोटमध्ये ‘एमआयएम’शी जुळवून घेतले. या प्रश्नावर श्रीकांत शिंदे यांनी भाजपला आरसा दाखवला. अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली असेल, तर हा प्रश्न भारतीय जनता पार्टीचा आहे. यासंदर्भात भाजपच्या नेत्यांना विचारणा केल्यास, ते चांगल्याप्रकारे विस्तृत स्वरुपात उत्तर देऊ शकतील. आम्ही नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे. या सगळ्या वृत्तींच्या विरोधातच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला होता. बाळासाहेबांनी देखील काँग्रेसविरोधात नेहमीच बंड पुकारले होते. आज असे होत असेल, तर त्याचे उत्तर आमच्यापेक्षा भाजप चांगल्या प्रकारे देऊ शकते. पण आमचा काँग्रेसला विरोध होता आणि पुढेही तीव्र विरोध राहील, असे श्रीकांत शिंदे म्हणालेत. ज्या विचारांविरुद्ध लढलो, त्यांच्याशी हातमिळवणी? श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेच्या मूळ विचारांची आठवण करून देत भाजपला टोला लगावला. ते म्हणाले. केंद्रामध्ये महायुती आहे. राज्यातही महायुती आहे. नगरपालिका निवडणुकीतही महायुतीच्या सगळ्यात जास्त जागा निवडून आल्या आहेत. महानगरपालिकेतही बहुतांश ठिकाणी महायुतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत कोणाबरोबर सत्ता स्थापन करत आहेत? ज्या विचारांच्या विरोधात आपण लढलो, अशा लोकांबरोबर सत्ता स्थापन कुणी करत असेल, तर हा त्यांचा प्रश्न आहे. याबद्दल त्यांनाच विचारले पाहिजे. कारण मी कुणाबरोबर तशी युती किंवा आघाडी केली नाही. मनपा निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल नगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेला राहिलेला आहे. नगरपालिका निवडणुकांत पूर्ण महाराष्ट्रात ६४ जागांवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. शिवसेना ६४ ठिकाणी नगराध्यक्ष बसवले, अशी कुणीही अपेक्षा केली नव्हती. पण लोकांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदेंवरील लोकांच्या प्रेमापोटी हे शक्य झाले. जिथे शिवसेनेची ताकद नव्हती, तिथेही शिवसेनेचा नगराध्यक्ष बसलेला आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्येही त्यापेक्षा मोठे यश मिळेल, असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!