न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका:हा षडयंत्राचा काळ, धनंजय मुंडे यांचे दमानियांना हिनवणाऱ्या आपल्याच समर्थकांना खडेबोल

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका करणाऱ्या आपल्या समर्थकांना खडेबोल सुनावलेत. न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका. हा षडयंत्राचा काळ आहे, असे ते म्हणालेत. मुंबई उच्च न्यायालायने धनंजय मुंडे यांना 2024 च्या कृषी विभागाच्या खरेदी – विक्री व्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात क्लीनचिट दिली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या क्लीनचिटला लोकायुक्तांकडे आव्हान दिले होते. लोकायुक्तांनीही सोमवारी मुंडे यांना दिलासा देत दमानिया यांची तक्रार धुडकावून लावली आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोणताही निर्णय देऊ शकत नाही, असे म्हणत लोकायुक्तांनी हे प्रकरण निकाली काढले. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अंजली दमानिया यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा षडयंत्राचा काळ – धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी यासंबंधी केलेल्या अनेक पोस्ट अंजली दमानिया यांनी सार्वजनिक केल्या. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांचे कान टोचलेत. ते मंगळवारी या प्रकरणी एका पोस्टद्वारे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा, असे ते म्हणालेत. काय होती अंजली दमानियांची तक्रार? अंजली दमानियांनी लोकायुक्तांकडे सादर केलेली तक्रार 2 गंभीर मुद्यांवर आधारित होती. 1) कृषी खरेदी घोटाळा संदर्भात महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पाच प्रकारच्या कृषी साहित्य व खतांची खरेदी बाजारभावाच्या जवळपास दुप्पट दराने आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या संदर्भात मी संबंधित साहित्य खुल्या बाजारातून अत्यल्प प्रमाणात व निम्म्याहून कमी दराने खरेदी करून त्याचे पुरावे लोकायुक्त कार्यालयासमोर सादर केले होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. 2) ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ व राख प्रकरण धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या मालकीच्या तीन कंपन्या फ्लाय अॅश व्यवसायात कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या कंपन्यांमार्फत बॉटम अॅशची अफरातफर (siphoning) होत असल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला होता. या संदर्भात Maharashtra State Power Generation Company Limited (महाजेनको) यांनी बीड येथील पोलीस अधीक्षकांकडे दाखल केलेल्या 40 तक्रारींची यादीही सादर करण्यात आली होती. राजकीय दबावामुळे या कोणत्याही एफआयआरवर कारवाई झालेली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते, असेही त्या या प्रकरणी म्हणाल्या.

Leave a Comment

error: Content is protected !!