अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माकड केल्याची अत्यंत जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पंतप्रधान मोदींची एखादी दुखरी नस लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेशी एक व्यापार करार केला आहे. विरोधकांनी या करारावर टीका करत या करारामुळे सरकारने भारतीय शेतकऱ्यांचे भवितव्य अमेरिकेच्या भरवशावर सोडल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना माकडासारखे आपल्या तालावर नाचवत असल्याचा आरोपही केला आहे. मोदी पीएम मोदींना माकडासारखे नाचवत आहेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला पूर्णतः उद्ध्वस्त करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले आहे. मोदी ट्रम्प सांगतील तेच करतात. रशियाकडून तेल खरेदी करायचे नाही, तर करायचे नाही. भारतीय कृषी सेक्टर अमेरिकेसाठी उघडायचे, तर उघडले. आतापर्यंत टेक्स्टाईलवर टेरिफ2.5 टक्के होता. तो आता 18 टक्के झाला आहे. मोदी ही चांगली गोष्ट असल्याचा दावा करत आहेत. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी दुखरी नस डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत. हे सर्व सार्वजनिक हिताचे विषय आहेत आणि या सर्व गोष्टी देशासाठी अपमानजनक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून मी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावून या मुद्यावर देशव्यापी आंदोलन करण्याची मागणी केली आहे, असे ते म्हणाले. मोदींकडून धर्म व जातव्यवस्था पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न काँग्रेस संसदेत जे करत आहे ती चांगली गोष्ट आहे. पण या सर्वसामान्य जनतेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रकरणी देशव्यापी आंदोलन करण्याची गरज आहे. या देशातील मध्यम वर्ग व सवर्ण समाजातून एक असा वर्ग उदयास येत आहे, जो पंतप्रधान मोदी धर्म व जातव्यवस्था पुन्हा जिवंत करत असल्याचा व त्याचे महत्त्व वाढवत असल्याचा आरोप करत आहे. आपण त्याची मदत केली पाहिजे. देश सर्वप्रथम व त्यानंतर इतर गोष्टी आहेत. या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडण्याची गरज आहे. राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे या प्रकरणी योग्य तो विचार करतील असा मला विश्वास आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.