Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

मी मरायला भीत नाही, तुमची सुपारी मीच फोडीन!:तू भंडारा लाव नाही तर काहीही लाव, मनोज जरांगेंचे धनंजय मुंडे समर्थकाला प्रत्युत्तर

“माझा समाज आणि माझे कुटुंब मी डावावर लावले आहे. कुणी भाळी भंडारा लावून मारण्याच्या धमक्या देत असेल, तर मी त्याला घाबरत नाही. उलट, माझ्या वाट्याला येणाऱ्यांची सुपारी मीच फोडीन,” अशा शब्दांत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक गोविंद फड यांना तडाखेबंद प्रत्युत्तर दिले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या आठवड्यात गोविंद फड यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला होता. धनुभाऊंच्या केसाला जरी धक्का लागला, तर खेळ खल्लास… असे पोस्टमध्ये म्हटले होते. आता या इशाऱ्याचा समाचार घेताना जरांगे यांनी मुंडे समर्थकांसह विरोधकांवर कडाडून टीका केली. धमक्या देऊ नका, समोरासमोर या जरांगे पाटील म्हणाले की, “तू कोणत्याही गावात ये, महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात माझा मराठा समाज उभा आहे. धमक्या देण्यापेक्षा समोर या, आम्ही लढायला समर्थ आहोत. मी माझ्या समाजाला मायबाप मानले आहे, त्यांच्यासाठी रात्रंदिवस बाहेर आहे. गरिबांची कामे करतो म्हणून मला मारणार असाल, तर माझी मरणाची कधीही तयारी आहे.” शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा शब्द केवळ आरक्षणावर न थांबता मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाष्य केले. “शेतकरी म्हणून एकजुटीने आंदोलनात उतरा. मी शब्द देतो, तुमचे कर्ज थकवून ठेवणार नाही. तुमच्या मालाला भाव कसा मिळत नाही, पीक विम्याचे पैसे कसे मिळत नाहीत आणि दुधाला दर कसा मिळत नाही, तेच आता मी बघतो. फक्त एकदा ‘बस’ म्हणलं की उठायचं नाही, ही चिकाटी ठेवा,” असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. ‘लाडकी बहीण’ योजनेवर टीका सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर निशाणा साधताना ते म्हणाले, “सरकारने पंधराशे रुपये दिले, पण महागाईच्या काळात ते पुरतात का? हे सरकार केवळ नादी लावते. आम्ही मात्र लढा देऊन मराठा समाजासह सर्व जातींच्या लेकीबाळींना मोफत शिक्षण मिळवून दिले आहे. मी जातीवादी असतो, तर फक्त मराठ्यांच्याच मुलींसाठी मागणी केली असती.” दौरे बंद करून नवी यंत्रणा उभारणार पुढील रणनीती स्पष्ट करताना जरांगे पाटील यांनी जाहीर केले की, आगामी ४-५ दिवसांत ते वर्षभरासाठी आपले दौरे बंद करणार आहेत. “चंद्र-सूर्य असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी यंत्रणा मी उभी करत आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाजाला अडचण आली, तर १५ मिनिटांत मदतीला माणूस पोहोचेल, अशी साखळी आपण निर्माण करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. घातपाताचा कट आणि ‘सगेसोयरे’ विषय “माझ्या विरोधात सुपाऱ्या दिल्या जात आहेत, माझ्या घातपाताचे प्रयत्न सुरू आहेत. पण त्यांना माहिती नाही, मी त्यांची सुपारी फोडल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा मनोज जरांगे यांनी विरोधकांना दिला. तसेच ‘सगेसोयरे’ अधिसूचनेची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आरक्षणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “अंतरावलीच्या दारात आलेला माणूस कोणत्याही जातीचा असला तरी मी त्याला रिकाम्या हाताने पाठवत नाही. महादेव मुंडे यांच्या प्रकरणात मीच पुढाकार घेऊन नार्को टेस्टपर्यंत प्रकरण नेले,” असे सांगून त्यांनी जातीवादाचे आरोप फेटाळून लावले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!