नागपूर येथील SBL कंपनीत झालेला भीषण स्फोट, ज्यामध्ये 22 निष्पाप कामगारांचा बळी गेला, तो केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासन आणि मालकांच्या संगनमताने केलेले हत्याकांड आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केला. या प्रकरणी लक्षवेधी सूचनेद्वारे त्यांनी सरकारला धारेवर धरले. वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर बोट ठेवत प्रश्न उपस्थित केला की, ज्या घटनेत 22 लोकांचा जीव गेला, तिथे अशी कलमे का लावली गेली ज्यामुळे आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे का? असा सवाल करत, कंपनी मालकावर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा (कलम 302) गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. कंपनीतील धक्कादायक वास्तव मांडताना वडेट्टीवार म्हणाले की: सुरक्षा यंत्रणा शून्य: कंपनीत फायर पंप नव्हते आणि रिस्क असेसमेंट देखील करण्यात आले नव्हते. अधिकारी गायब: नियमानुसार दोन सुरक्षा अधिकारी हवे असताना केवळ एकच होता. फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त केलेले डॉ. शशांक डोंगरे हे कधीच कंपनीत फिरकले नाहीत. सीसीटीव्हीचा अभाव: अत्यंत संवेदनशील स्फोटक कंपनी असूनही तिथे सीसीटीव्ही नव्हते आणि इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद नाही. प्रशिक्षणाशिवाय काम: स्फोटके हाताळण्याचे कोणतेही तांत्रिक प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नव्हते. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी पेसो चे मुख्यालय नागपुरात असूनही अधिकारी तपासणीला का गेले नाहीत? कामगार अधिकारी आणि निरीक्षकांनी केवळ पैसे घेऊन लोकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे, असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. ज्या निरीक्षकाने या कंपनीला ‘सुरक्षित’ असल्याचे प्रमाणपत्र दिले, त्याला तात्काळ निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. मंत्र्यांच्या उत्तरावर नाराजी आणि सभात्याग दीड वर्षात अनेक स्फोट झाले तरी सरकार काय कारवाई करत आहे? अधिकाऱ्यांना पाठीशी का घालत आहे? असा जाब वडेट्टीवार यांनी विचारला. मंत्र्यांनी यावर कायदेशीर दृष्ट्या जे शक्य असेल ते करू असे मोघम उत्तर दिले. मात्र, ठोस कारवाईचे आश्वासन न मिळाल्याने संतापलेल्या विरोधकांनी सरकारचा धिक्कार करत सभागृहातून सभात्याग केला.
