राऊत आधी आपले नगरसेवक सांभाळा, मग इराणवर बोला:भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जागतिक राजकारणाचे सल्ले देऊ नका- नवनाथ बन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, संजय राऊत मात्र निराधार टीका करत आहेत. स्वतःच्या पक्षाचे नगरसेवक आणि राज्यसभेचे उमेदवार ठरवताना नाकीनऊ येणाऱ्या राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करणे म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्यासारखे’ आहे, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना राज्यसभेचा एक उमेदवार ठरवण्यासाठी महिनाभराचा वेळ लागतो, अशी टीका करत बन म्हणाले की, ज्यांना नगरसेवक सांभाळता येत नाहीत आणि स्वतःच्या पक्षाचे निर्णय घेताना दमछाक होते, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद आहे. इराण-इस्रायल वादावर सल्ले देण्यापेक्षा राऊतांनी आधी आपल्या पक्षाची ढासळती अवस्था सुधारावी. राऊत तुम्ही सोनिया गांधी आणि शरद पवारांची कठपुतळी म्हणून तुम्ही वागत आहात. काँग्रेसची गुलामगिरी करणे थांबवा कॉंग्रेसवर टीका करताना बन म्हणाले की, देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज संजय राऊत त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. भाजप सरकारने देशाला स्वाभिमान दिला असून, आज भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. राऊत सध्या काँग्रेसची गुलामगिरी करत आहेत, त्यांनी स्वतःचा स्वाभिमान शोधावा. गाढव नाक्यावरून सल्ला देणे बंद करा संजय राऊत स्वतःला आंतरराष्ट्रीय अभ्यासक समजून रोज सकाळी उठून पंतप्रधान मोदींना सल्ले देण्याचा ‘धंदा’ करत आहेत. यावर भाष्य करताना बन म्हणाले की, राऊतांना जर युद्धनीतीचा इतकाच अभ्यास असेल, तर त्यांनी गाझा किंवा इराण-इस्रायल सीमेवर जाऊन परिस्थिती सांभाळावी. भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून देशहिताच्या गप्पा मारणे बंद करावे. मोदींच्या नेतृत्वावर १४० कोटी जनतेचा विश्वास आहे आणि ते अत्यंत सक्षमपणे देशाचे धोरण ठरवत आहेत. म्हणून जनतेने नाकारले संजय राऊत यांच्या विधानांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राऊत खालच्या भाषेत टीका करत असल्यामुळेच जनतेने त्यांना आतापर्यंत तीन वेळा नाकारले आहे. त्यांनी ही खालच्या पातळीची टीका थांबवावी, अन्यथा त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.

Leave a Comment

error: Content is protected !!