वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या मनमानी विरोधात आंदोलन:अभिनव नगरातील स्थानिकांचा रोष; अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनसंरक्षक अनिता पाटील यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आज येथील अभिनव नगरातील स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलन केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या अभिनव नगर या उचभ्रू वस्तीतील नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे. या नागरिकांनी त्यांच्या जागेत वनसंरक्षकांच्या आदेशानुसार सुमारे २२५० चौ.फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. आजचे आंदोलन पालिकेचे नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. येथील नागरिकांत अनिता पाटील यांच्या विरोधात नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी याकडे लक्ष देऊन योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी आंदोलक आणि स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. अनिता पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या कामकाजाबाबत परिसरात मोठा असंतोष निर्माण झाल्याचे येथील आदिवासी बांधव व आंदोलकांचे म्हणणे आहे. या परिसरात राहणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांकडे पुरावे व दस्तऐवज आहेत. पण त्यानंतरही त्यांच्यावर तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे काही दिवसांपूर्वी या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आणि दगडफेकीची घटना देखील घडली होती. आंदोलकांनी उद्यान परिसरात स्थानिकांच्या वाहनांवरही निर्बंध घालण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला. या वाहनांचा वापर पर्यटकांच्या सोयीसाठी केला जातो. त्यामुळे आंदोलकांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दरम्यान, अनिता पाटील यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या खात्यात आपली बदली करून घेतली, तर काहींनी त्यांच्या नोकरीला रामराम ठोकला होता.

Leave a Comment

error: Content is protected !!