राज्य विधिमंडळात आज टी-20 विश्वचषकावर देशाचे नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव सादर करताना भारताच्या विजयात मोलाचे योगदान करणाऱ्या सर्वच खेळाडूंचे कौतुक केले. या विजयामुळे टी-20 विश्वचषकावर तिसऱ्यांदा आपले नाव कोरणारा भारत जगातील पहिला देश बनला आहे, असे ते म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, आज सभागृहात भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन करताना मला अतिशय आनंद वाटत आहे. अभिमान वाटत आहे. भारतीय संघाने यंदाच्या टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझिलंड संघाचा पराभव केला. 96 धावांनी विजय मिळवला. या विजयासह तिसऱ्यांदा विश्वचषकावर आपले नाव कोरले. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला देश बनला आहे. एवढेच नाही तर सलग दुसऱ्यांदा ही कामगिरी करणारा पहिला देशही बनला आहे. संजू सॅमसनचे तोंडभरून कौतुक मुख्यमंत्री म्हणाले, अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर अंतिम सामना झाला. त्यात भारताने 20 वर्षांत 5 बाद 255 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील आजपर्यंतचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. हे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय गोलंदाजांनी न्यूझिलंडच्या संघाचा डाव केवळ 159 धावांमध्ये गुंडाळला. विशेषतः आमच्या फलंदाजांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली. संजू सॅमसन यांनी गेल्या तिन्ही सामन्यांत भारताला विजयाच्या दिशेने नेले. त्यांनी 46 चेंडूंत 89 धावा करून संघाच्या विजयाचा भक्कम पाया रोवला. शर्मा, इशान, बुमराह, अक्षर पटेलचेही कौतुक मुख्यमंत्री म्हणाले, अभिषेक शर्मा यांनी वेगवान अर्धशतक ठोकले. त्यांनी 21 चेंडूंत 52 धावा काढल्या. इशान किशन यांनी 25 चेंडूींत 54 धावा काढल्या. त्यांनीही अतिशय जलद अर्धशतक केले. टिळक वर्मा व शिवम दुबे यांनीही आपल्या संघाच्या धावसंख्येत महत्त्वाची भर टाकली. गोलंदाजींनीही अतिशय उत्तम योगदान दिले. जसप्रित बुमराह यांनी 4 बळी घेत निर्णायक पद्धतीने बॉलिंग केली. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक इकॉनॉमिक बॉलर म्हणून त्यांनी कमीत कमी धावा देत भारतीय संघाला जिंकवले. मुंबईत झालेल्या सेमीफायनलमध्येही त्यांचाच ओव्हर निर्णायक ठरला होता. अक्षर पटेल यांनीही 3 बळी घेत संघाला भक्कम आधार दिला. त्यामुळे फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रांत भारतीय संघाने अत्यंत उत्तम काम केले. या संपूर्ण मालिकेत एका मॅचचा अपवाद वगळता आपल्या संघाने सर्व सामने जिंकले. त्यामुळे आपल्या या विधानसभेच्या माध्यमातून मी भारतीय संघ व त्याचे कर्णधार सूर्यकुमार यादव व प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. संघभावना, शिस्त व आत्मविश्वास या तिन्ही गोष्टी या संघात आपल्याला पहायला मिळाल्या. विशेषतः संजू सॅमसन यांचा संघात ऐनवेळी सहभाग झाला. पण त्यानंतर त्यांनी ही सर्व मालिका गाजवली. कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतरही इशान किशन मैदानात मुख्यमंत्री म्हणाले, संजू सॅमसन यांची वेस्ट इंडिज व इंग्लंडविरोधातील त्यांची खेळी निर्णायक ठरली. काल तर ठरलीच. जसप्रित बुमराह यांनी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताचे प्रमुख गोलंदाज म्हणून नाव कमावले आहे. भारतीय क्रिकेटला मिळालेला एक अनमोल खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. विशेषतः इशान किशन यांचेही आपण विशेष अभिनंदन करूया. कारण, अंतिम सामन्यापूर्वी एक दिवस अगोदर त्यांच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या ही परिस्थितीत त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून ते अत्यंत ताकदीने मैदानात उतरले व भारताला विजयाकडे नेले. अशा धैर्यवान खेळाडूचेही मी विशेष अभिनंदन करतो. क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, भारतीय क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाची सुरुवात 1983 साली झाली. कपील देव यांच्या नेतृत्वातील संघाने तेव्हा वेस्ट इंडिजला हरवून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. 2007 मध्ये महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वात आपण पहिल्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2011 मध्ये आपण एकदिवसीय विश्वचषक जिंकला. त्यानंतर 2024 व 2026 मध्ये पुन्हा आपण टी-20 विश्वचषक जिंकून आपण क्रिकेट या खेळात भारताचा दबदबा सिद्ध केला. मुख्यमंत्री म्हणाले, कर्णधार सूर्यकुमार यादव हे आपल्या मुंबईचे आहेत. शिवम दुबेही मुंबईचे आहेत. मुंबईने अनेक महान खेळाडू भारताला दिलेत. आज आपल्या गावातील सामान्य खेळाडूही आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत. यातील अनेक खेळाडू अत्यंत गरीब परिस्थितीतून आलेत. ते आज खेळाचे व देशाचे नाव मोठे करत आहेत. मी या सभागृहाच्या वतीने अभिनंदनाचा प्रस्ताव पास करून त्याची एक प्रत ही आपल्या भारतीय संघाला पाठवावी अशी विनंती मी करतो, असे ते म्हणाले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते पारित झाल्याचे घोषित करून त्याची प्रत संबंधितांना पाठवण्याचे आदेश दिले.