आर्थिक विवंचनेतून टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता; कुटुंबावर दुःखाचा डोंगर
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे एका ३९ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. ९ मार्च) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल बंडू आत्राम (वय ३९, रा. मार्डी, ता. मारेगाव) हे शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या दरम्यान त्यांनी आपल्या राहत्या घरातील स्वयंपाकघरात टीनच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याचे समोर आले.
दरम्यान, ही घटना मृतकाचा मुलगा श्रेयस याच्या निदर्शनास आली. वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहताच त्याने तात्काळ आपल्या काकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता प्रफुल आत्राम हे गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती तात्काळ गावातील पोलिस पाटील व पोलिसांना देण्यात आली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.प्राथमिक माहितीनुसार, शेतीत अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत प्रफुल आत्राम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या अकाली निधनामुळे मार्डी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगांबर किनाके तसेच पोलीस कर्मचारी सागर दीपेवार व नरेंद्र तुमराम करीत आहेत.
