आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या 113 व्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रीती संगम येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी प्रीतीसंगम येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी समाधीस्थळावर नतमस्तक होत त्यांच्या कार्याला आणि विचारांना आदरांजली अर्पण केली. जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे परिसरात भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावेळी बोलताना सुनेत्रा पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, प्रीतीसंगम येथील हे समाधीस्थळ नेहमीच प्रेरणा आणि शक्ती देणारे स्थान राहिले आहे. स्वर्गीय अजित पवार हे देखील या ठिकाणी नेहमी येत असत आणि त्यांच्यासाठी हे श्रद्धास्थान होते, असे म्हणत त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. चव्हाण साहेबांच्या विचारांवर काम करण्याची प्रेरणा त्यांना नेहमी मिळत असे. आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोन फेब्रुवारी रोजीही येथे येऊन अभिवादन केले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली. पुढील काळातही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर आधारित काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असेही त्या म्हणाल्या. जयंतीनिमित्त ‘शब्द सुरांची भावपूर्ण आदरांजली’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गीत-संगीताच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा आणि विचारांचा गौरव करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे उपस्थितांना त्यांच्या कार्याची पुन्हा आठवण करून देण्यात आली. विद्यार्थिनींनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट दरम्यान, प्रीतीसंगम येथे अभिवादन करून परतत असताना काही शाळकरी विद्यार्थिनींनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. विद्यार्थिनींनी त्यांना नमस्ते करत हस्तांदोलन केले आणि थोडा संवादही साधला. विद्यार्थिनींच्या या उत्साही भेटीमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगामुळे कार्यक्रमाला अधिक आपुलकीची छटा लाभली आणि उपस्थितांनीही या क्षणाचे स्वागत केले. प्रीतीसंगम परिसरात मोठी गर्दी या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाले. यामुळे प्रीतीसंगम परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली.
