महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मुंबई ATS ने सकाळपासून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड येथे 14 ठिकाणी आणि अहिल्यानगर (अहमदनगर) येथे 7 ठिकाणी शोधमोहीम सुरू केली. काही तरुणांना दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून सक्रिय करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची गुप्त माहिती ATS ला मिळाली होती. एटीएसने सर्वात मोठी कारवाई विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात केली आहे. जिल्ह्यातील पुसद आणि उमरखेड या दोन शहरांमध्ये तब्बल 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या थेट नेतृत्वाखाली ही मोहीम राबवली जात असून, एकट्या यवतमाळ जिल्ह्यात एटीएसची 20 पथके तैनात आहेत. या कारवाईत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसह स्थानिक पोलिसांचा मोठा ताफा सहभागी आहे. अहिल्यानगरमधील मुकुंदनगर या भागात एटीएसने 7 ठिकाणी छापेमारी केली. गेल्या काही काळात औरंगजेबाचे उदात्तीकरण आणि आक्षेपार्ह घोषणाबाजीमुळे हा भाग चर्चेत आला होता. काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची आणि त्यांना सक्रिय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर एटीएसने ही गोपनीय कारवाई केली. दहशतवादी संघटनांशी संपर्क असल्याचा संशय काही तरुण दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असून ते सक्रिय होत असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करण्यात आली. या मोहिमेत वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जात आहे. अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागातही रात्रीपासून ही कारवाई सुरू आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा प्रश्न आज महाशिवरात्र असल्याने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे. तसेच शिवजयंती आणि इतर सण-उत्सव तोंडावर आहेत. याच काळात राज्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एटीएसने ही तातडीची पावले उचलली आहेत का, अशी चर्चा सुरू झाली आहे. रात्रभर चाललेल्या या मोहिमेत अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांना आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अद्याप कुणालाही अधिकृतपणे अटक केल्याची माहिती समोर आलेली नाही. ही कारवाई अत्यंत गोपनीय पद्धतीने राबवली जात असून, यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
