अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा:ड्रग्स प्रकरणावरून अनिल परब संतापले; मंत्री योगेश कदमांचे प्रत्युत्तर

सातारा जिल्ह्यातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी सापडलेल्या मोठ्या ड्रग्स साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाचे पडसाद आता थेट विधिमंडळात उमटले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या हॉटेलचा संबंध थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाशी जोडून सरकारवर गंभीर आरोप केले होते, तर आता विधानसभेत राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा लावून धरला. यावर गृहमंत्री योगेश कदम यांनी शासनाची भूमिका मांडली असली तरी, ड्रग्सच्या वाढत्या विळख्यावर संताप व्यक्त करत अनिल परब यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमली पदार्थ तस्करांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी अक्षय शिंदेप्रमाणेच दोन-चार गुन्हेगारांना उडवून द्या, अशा शब्दांत परब यांनी कठोर कारवाईची मागणी करत प्रशासनाला धारेवर धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे म्हणाले, राज्यात एमडी ड्रग्स मोठ्या प्रमाणात चालले आहे. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय होतो. त्यामुळे येथे सर्च ऑपरेशन करून यावर आळा घातला जाईल का? त्या आरोपींविरोधात मकोका लावण्यात येणार का? असा सवाल उपस्थित केला. यावर योगेश कदम म्हणाले, जावळीमध्ये जी कारवाई झाली, त्या कारवाईत 11 आरोपींवर आपण मकोको लावून कारवाई करत आहोत. राज्यातील काही ग्रामीण ठिकाणी जिथे 40-50 अशी लोकवस्ती आहे तिथे व्यवसाय चालू केले जात आहेत. त्यामुळे सर्वच यंत्रणांना अलर्ट करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा- अनिल परब अनिल परब म्हणाले, सरकार गंभीर आहे पण सरकारचे कोणी ऐकत नाही अशी सध्या परिस्थिती आहे. चार हजार कोटीचे एमडी ड्रग्स पकडले गेले. पिढी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. टास्क फोर्स तयार करण्यात आलेला आहे, काही लोकांना पकडले असे सांगण्यात येते. पण केमिकल मिक्स करणारे केमिस्ट आहेत त्यात केमिस्टला पकडण्यात आले आहे का? किती केमिस्ट पकडले याची माहिती सभागृहाला दिली गेली पाहिजे. मागच्या सरकारमध्ये गँगवार कंट्रोल करण्यासाठी जसा एन्काऊंटर स्कॉड बनवला गेला तसा एन्काऊंटर स्कॉड आता बनवणार का? अक्षय शिंदेला जसे उडवले तसे दोन-चार लोकांना उडवा, म्हणजे जीवाची भीती निर्माण झाल्याशिवाय हे थांबणार नाही. पोलिसांची भीती असलीच पाहिजे- योगेश कदम अनिल परब यांना उत्तर देताना योगेश कदम म्हणाले, या रॅकेटमध्ये जे असतात त्यांच्यामध्ये पोलिसांची भीती असलीच पाहिजे. आता करत असलेली कारवाई काही सोपी नाही. जे कोणी यात सक्रिय आहेत. रस बनवायला आता केमिस्टची गरज लागत नाही. त्यामुळे रस बनवण्यात जे काही सहभागी असतील, पोलिस सहभागी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. आतापर्यंत पंधरा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले. दहा पोलिसांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती कदम यांनी दिली. डेडिकेटेडली टास्क फोर्स तयार करणार पुढे बोलताना योगेश कदम म्हणाले, सातारामध्ये जी कारवाई झाली ती डीआरएफ मार्फत झाली आहे. आजच्या तारखेला एमडी ड्रग्स बनवणे अत्यंत सोपे झाले आहे. 6 महिन्यांपूर्वी मालाडमधील झोपडपट्टीत राहणाऱ्या दोन महिलांनी स्टोवर बनवले होते. आता डेडिकेटेडली टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे, त्यांच्याकडे कोणताही दुसरा तपास राहत नाही. रिक्त पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत, एएनटीएफमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना इन्सेंटिव्ह देखील दिले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसेच जे रॉ मटेरियल सप्लाय करत आहेत, त्यांच्यावर देखील मकोका दाखल केला आहे. ड्रग्सच्या बाबतीत महाराष्ट्रात विषय गांभीर्याने घेतले आहे आणि अजून आक्रमकपणे या कारवाया केल्या जातील, असे कदम यांनी सांगितले.

Leave a Comment

error: Content is protected !!