बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आणि दुय्यम अभियंता पदावरील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या बदल्यांमध्ये अनियमिततेच्या तक्रारी आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा ‘स्टे’ कायम असतानाच महापौर रितू तावडे यांनी प्रशासनाला या बदल्यांची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत पत्र लिहिल्याने पालिका वर्तुळात मोठा गोंधळ आणि संभ्रम निर्माण झाला. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून या बदल्या कशा केल्या जात आहेत, असा प्रश्न उपस्थित होताच महापौर तावडे यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्यांच्या मुद्द्यावरून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली असून, या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती दिली असतानाच, महापौर रितू तावडे यांनी या बदल्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला पत्र पाठवल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र रितू तावडे यांनी यावर आता स्पष्टीकरण दिले आहे. मुंबई महापालिकेतील अभियंता बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची महापौरांनी कोणतीही सूचना केलेली नाही. दी म्युनिसिपल युनियन यांनी पाठवलेले पत्र प्रशासनाकडे नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यासाठी फक्त अग्रेषित केले होते. प्रशासनाने स्थगिती विषयक माहिती देणारे अभिप्राय सादर केल्यानंतर ते पत्र दहा दिवसापूर्वीच दप्तरी दाखल केले. त्यामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक अभियंता, दुय्यम अभियंता पदावरील अभियंत्यांच्या बदल्यांवरील स्थगिती उठवण्याची कोणतीही सूचना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केलेली नाही, असे स्पष्टीकरण तावडे यांच्याकडून देण्यात आले आहे. दि म्युनिसिपल युनियनने अभियंत्यांच्या बदल्यांसंदर्भात महापौरांना दिलेले पत्र केवळ प्रशासकीय अभिप्रायासाठी पुढे पाठवण्यात आले होते, असे स्पष्टीकरण महापौर कार्यालयाकडून देण्यात आले आहे. प्रशासनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापौरांनी स्वतः दहा दिवसांपूर्वीच ते पत्र दप्तरी दाखल करण्याचे आदेश दिले होते, ज्याचा अर्थ त्यावर कोणतीही पुढील कार्यवाही केली जाऊ नये असा होतो. या स्पष्टीकरणामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्थगिती आदेशानंतरही महापौरांनी कारवाईचे पत्र लिहिल्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
