हॉटेल व्यवसाय चुलीवर:मुंबई, संभाजीनगरसह प्रमुख शहरांतील हॉटेलांत पेटल्या चुली; गॅस बुकिंगचे नंबरही बंद, तुमच्याकडे काय?

इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाच्या थेट झळा आता महाराष्ट्राला बसत आहेत. राज्यात जवळपास सर्वच शहरांत स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गॅस एजन्सीपुढे नागरिकांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. त्यातच सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर निर्बंध घातल्यामुळे हॉटेल व्यावसायिकही अडचणीत सापडलेत. पण त्यांनी या ही बिकट परिस्थितीत चूल पेटवून आपला व्यवसाय पुढे चालवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर आदी प्रमुख शहरांसह अनेक जिल्ह्यांमध्ये गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ग्राहकांनी ऑनलाइन व फोनद्वारे सिलिंडर बुकिंग केलेत. पण त्यांना वेळेवर डिलिव्हरी होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गॅस एजन्सींसमोर दिसणारे दृश्य गेल्या काही दिवसांत अधिकच गंभीर झाले आहे. अनेक ठिकाणी नागरिक सकाळी एजन्सी उघडण्यापूर्वीच रांगेत उभे राहत आहेत. याचा महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. हॉटेल्स, ढाब्यांवर पेटल्या चुली दुसरीकडे, सरकारने व्यावसायिक गॅस पुरवठा बंद केल्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे व लहान खाद्यव्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक हॉटेल व्यावसायिकांकडे दोन-तीन दिवसांचा गॅसचा साठा होता. पण आता तो संपला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हॉटेल्स चालवणे अवघड झाले आहे. परिणामी, काही हॉटेल्सनी चुली पेटवून तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी व्यवस्था सुरू केली आहे. अनेक हॉटेल्समध्ये लाकडी चुली पेटवून स्वयंपाक केला जात आहे. तर काही हॉटेल्समध्ये कोळशाच्या शेगड्यांचा वापर केला जात आहे. संभाजीनगरमध्येही पेटल्या चुली जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईमुळे छत्रपती संभाजीनगर येथील महावीर चौकातील शिवगणेश हॉटेलसह अनेक हॉटेल्स उघड्यावर चुली पेटवून स्वयंपाक करत आहेत. हॉटेल मालक प्रवीण कुमार याविषी सांगतात, ही स्थिती अशीच सुरू राहिली तर आमच्यावर हॉटेल बंद करण्याची वेळ येऊ शकते. पुण्यातील एका हॉटेल मालकाने सांगितले की, व्यावसायिक गॅस सिलिंडर मिळत नसल्यामुळे आमच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. व्यवसाय बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही चुलीवर काही पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. मुंबई आणि ठाण्यातील अनेक छोट्या खानावळींनीही अशीच व्यवस्था सुरू केली आहे. चहा, नाश्ता आणि काही मर्यादित पदार्थ कोळशाच्या शेगड्यांवर बनवले जात आहेत. चुलीवर मोठ्या प्रमाणावर जेवण बनवणे अवघड आहे. त्यामुळे अनेक हॉटेल्सनी आपल्या मेन्यूतील काही पदार्थ तात्पुरते बंद केले आहेत. ग्राहकांनाही या परिस्थितीचा फटका बसत आहे. काही रेस्टॉरंटमध्ये आवडीचे पदार्थ उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांवर आल्यापावली परत जावे लागत आहे. यामुळे त्यांचा हिरमोड होत आहे. ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी पुन्हा आपल्या पारंपरिक चुलींचा वापर सुरू केला आहे. बुकिंगचे नंबर बंद छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी गॅस एजन्सीसमोरच्या रांगात वाढ झालेली दिसली. रस्त्यावर अनेक ठिकाणी टू व्हिलरवर लोक रिकामा सिलिंडर घेऊन गॅस एजन्सीकडे जाताना दिसले. कारण अनेक गॅस एजन्सीने बुकिंग फोन बंद केलेत. ज्यांनी बुकिंग केले आहे, त्यांना ते मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झालीय. उद्या स्वयंपाकच झाला नाही, तर कसे असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय. त्यामुळे लोक सिलिंडर घेऊन थेट एजन्सीकडे जातायत. दुसरीकडे अनेक छोट्या-छोट्या हॉटेलांनी आपला धंदा बंद केल्याचेही दिसले.

Leave a Comment

error: Content is protected !!