साईबाबा संस्थानाकडून भाविकांना आता फक्त एकच लाडू प्रसाद:गॅस टंचाईचा परिणाम; काटकसर करून उपलब्ध साठा टिकवण्याचा प्रयत्न

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र देशभर दिसत आहे. या परिस्थितीचा परिणाम आता महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांवरही जाणवू लागला आहे. शिर्डीतील प्रसिद्ध साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका बसला असून प्रसाद वितरणात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोज लाखो भाविक दर्शनासाठी शिर्डीत येत असल्याने प्रसादासाठी मोठ्या प्रमाणात लाडू तयार केले जातात. मात्र गॅस साठा मर्यादित असल्यामुळे संस्थानने आता प्रत्येक भाविकाला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. साई संस्थानच्या माहितीनुसार, दररोज सुमारे पंचेचाळीस हजार लाडू पाकीटांची विक्री केली जाते. याशिवाय दर्शनासाठी उभ्या असलेल्या भक्तांना दररोज जवळपास पन्नास हजार बुंदी प्रसाद पाकीटांचे मोफत वितरण केले जाते. लाडू तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गॅसची आवश्यकता असते. सध्या गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे प्रसाद तयार करताना इंधन बचत करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे भाविकांना देण्यात येणाऱ्या प्रसादाच्या प्रमाणात कपात करण्याचा निर्णय संस्थानने घेतला असून यामुळे आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. साई संस्थानकडे सध्या लाडू बनवण्यासाठी लागणारा गॅस फक्त दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच उरला असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर गॅसचा वापर नियंत्रित ठेवण्यासाठी संस्थानाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला फक्त एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार आहे. गॅस वापरात काटकसर करून उपलब्ध साठा अधिक काळ टिकवण्याचा प्रयत्न संस्थानकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. गुजरातमधील हाजीराबाद येथून गॅस टँकर दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या इंडेन बॉटलिंग प्रकल्पातून होणाऱ्या गॅस सिलिंडर पुरवठ्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाला आहे. यापूर्वी या प्रकल्पातून दररोज सुमारे शंभर गाड्यांमधून सिलिंडरची वाहतूक केली जात होती. मात्र सध्या ही संख्या कमी होऊन फक्त तीस ते पंचेतीस गाड्यांपर्यंत मर्यादित झाली आहे. प्रकल्पातील दोन भरणी केंद्रांपैकी सध्या फक्त एकच केंद्र सुरू असल्याची माहिती आहे. गुजरातमधील हाजीराबाद येथून गॅस टँकर येत असले तरी संभाव्य टंचाई टाळण्यासाठी कोटा कमी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तरीही ग्राहकांना अडचण निर्माण होऊ नये यासाठी रोज काही प्रमाणात सिलिंडर भरून पाठवले जात असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!