उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषदेत जायचे असल्यास इतर पक्षांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना विधान परिषद निवडणुकीत साथ देतात का, हे पाहावे लागेल. त्या पाठिंब्याशिवाय त्यांचे आमदार होणे शक्य नाही. उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी विधान परिषदेवर निवड होऊन मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या समोर कोणतीही थेट निवडणूक उपलब्ध नाही. त्यामुळे सभागृहात जाण्यासाठी विधान परिषदेचा मार्ग हाच एकमेव पर्याय उरतो, असे मत मंत्री संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. महाविकास आघाडीबाबत बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, काँग्रेसने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही. काँग्रेसची शरद पवार गटासोबत जाण्याचीही इच्छा उरलेली नाही, तर उद्धव ठाकरे गटाला त्यांनी आधीच बाजूला केले आहे. आगामी काळात काँग्रेस स्वबळावरच राजकारण करेल, असेच चित्र दिसत आहे. मुंबईत संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवार दिला नाही उगाच मराठी माणूस म्हणून काही बोलू नये. मविआ आता राहिलेली नाही. शरद पवार राज्यसभेवर जाणार नाहीत, ते काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. बारामतीमध्ये पोटनिवणुकीत बिनविरोध निवडणूक होईल असे वाटते.
निवडणूक आयोग दखल घेईल संजय शिरसाट म्हणाले की, सोलापूरमध्ये धाब्यावर EVM मशीन सापडल्या तो प्रकार नेमके काय आहे हा चौकशीचा भाग आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घेतली असेल नेमका हा प्रकार काय हे अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यावर समजेल. सोशल मिडीयावर काहीही येते संजय शिरसाट म्हणाले की, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जे काही दावे, आरोप होत आहेत खरंतर याची चौकशी सुरू आहे. आपले मत पोलिसांकडे नोंदवले पाहिजे. अजित पवारांच्या जाण्याचे दु:ख कमी आसणि आरोपांच्या फैरी जास्त झाडल्या जात आहे. हे काही बरोबर नाही. सोशल मिडीयावर कधी काय येईल याचा काही भरोसा राहिलेला नाही. यामुळे लोकं गोंधळात पडत आहेत, यावर बोलणं योग्य नाही. अजित पवारांवर आता बोलणं योग्य नाही. संघाचे आपले वेगळे धोरण संजय शिरसाट म्हणाले की, संघाचे आपले एक धोरण असते ते स्वत:चे निर्णय स्वत घेत असतात. त्यांच्या कार्यकारणीमध्ये कुणाला घ्यायचे काय करायचे हा त्यांचा मुद्दा आहे. संघाच्या कार्यकारणीमध्ये इतरांचा हस्तक्षेप नसतो.ते स्वतंत्र निर्णय घेत असतात. संघाने आणि त्यांच्या कार्यकर्त्यांने कुणाला मतदान करावे असे सांगितले जात नाही. ते कोणत्या एका पक्षाचा कार्यकर्ता नसतो. सलमान खान संघाच्या कार्यक्रमाला आला तर काय बिघडले? त्यांची विचारधारा बदलली आहे का? त्यावर आक्षेप घेणं गैर आहे.
