Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

पिकांचे अवशेष बारीक करून शेतातच कुजविण्याची मोहीम

कृषि विभागाचा पुढाकार

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव: तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे क्षेत्र असून कापूस काढणीनंतर पऱ्हाट्या उपटून जाळून टाकण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होत असल्याने कृषि विभागाच्या वतीने पिकांचे अवशेष शेतातच कुजविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवायचे असल्यास जमिनीची सुपीकता टिकवणे आवश्यक आहे. याच उद्देशाने तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कॉटन श्रेडरच्या माध्यमातून कापूस पिकांचे अवशेष बारीक करून जमिनीत मिसळण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी कृषि विज्ञान केंद्र, यवतमाळ यांनी कॉटन श्रेडर हे यंत्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.

साधारणपणे एका हेक्टर कापूस पिकातून २० ते ३० क्विंटलपर्यंत पऱ्हाट्या उपलब्ध होतात. त्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास मातीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, विविध अन्नद्रव्यांची उपलब्धता होते आणि जमीन अधिक सुपीक बनते. तसेच माती भुसभुशीत होऊन तिची जलधारण क्षमता वाढते. परिणामी उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढण्यास मदत होते, असे मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी सांगितले.

दरम्यान, महादापेठ येथे नुकतेच कॉटन श्रेडरच्या माध्यमातून पऱ्हाट्या काढण्याचे प्रात्यक्षिक सहायक कृषि अधिकारी अक्षय सोनूले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. या प्रात्यक्षिकावेळी महादापेठ (कुंभा) येथील अमोल बोथले, दशरथ चौधरी, हितेंद्र बोथले, प्रकाश मोहितकर, विवेक जेणेकर, अनंत बोथले यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

या उपक्रमासाठी कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख दिपक कच्छवे व राहुल चव्हाण यांनी कॉटन श्रेडर उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषि विभाग तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!