काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भोंदूबाबा अशोक खरात व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यातील कथित संबंधांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट हल्ला चढवला आहे. रुपाली चाकणकरांवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने तंत्रमंत्रांच्या नादी लागून स्वतःची अनामिका कापणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. देवेंद्र पंतांच्या सहकाऱ्यांचे अजून काय काय उपद्व्याप बघायचे आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने? असे त्यांनी म्हटले आहे. राज्यातील अनेक महिलांना गुंगीचे औषध देऊन त्याचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या खरातची पाद्यपूजा केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चाकणकरांवर तंत्रमंत्रांसाठी खरातच्या साक्षीने स्वतःची अनामिका कापल्याचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ? हर्षवर्धन सपकाळ शुक्रवारी म्हणाले, देवेंद्र पंतांच्या सहकाऱ्यांचे अजून काय काय उपद्व्याप बघायचे आहेत या पुरोगामी महाराष्ट्राने? रुपाली चाकणकर यांच्यावर झालेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. हे जर खरे असेल तर, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला आयोगाच्या अध्यक्षपदासारख्या अत्यंत जबाबदारीच्या पदावरील व्यक्तीने तंत्रमंत्राच्या नादी लागून अनामिका कापणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातच आता सौ. रुपाली चाकणकर या फरार असल्याच्या बातम्या येत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून त्वरित हकालपट्टी करावी. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. त्यांनी अशोक खरात च्या माध्यमांतून आणखी काय काय अघोरी कृत्य केले, महिलांवर झालेले अत्याचार, सापडलेले व्हिडिओ, धमकावून खंडणी मागणे या प्रकरणातही रूपाली चाकणकर यांचा सहभाग आहे का, हे ही तपासण्यात यावे. ही प्रवृत्ती सरकारने वेळीच ठेचायला हवी, असे ते म्हणालेत. नाना पटोलेंचा कृषिमंत्री भरणेंवर निशाणा आमदार नाना पटोले यांनी या प्रकरणी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील या भोंदूबाबा कॅप्टन खरात आणि त्याच्या हस्तकांना वाचवण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कृषिमंत्र्यांनी कुणाला क्लीनचिट देण्यापेक्षा राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत, असे त्यांनी म्हटले आहे. आत्ता पाहू काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलेत. त्या म्हणाल्या, रुपाली चाकणकर तंत्रमंत्र विद्या करत होत्या. यासाठी त्यांनी 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला स्वतःची अनामिक कापली होती. हे कृत्य अशोक खरातपुढे झाले होते. खरातनेच कर्मकांडासाठी त्यांना अनामिक कापण्यास सांगितले होते. त्यातून त्यांच्या बोटाला जखम झाली. ती जखम तब्बल 4 महिने तशीच होती. त्याचा एक फोटोही माझ्याकडे आहे. त्यात चाकणकरांनी अनामिकाला बँडेज लावल्याचे दिसून येत आहे. रुपाली चाकणकर व अशोक खरात यांचे घरगुती संबंध आहेत. खरातच्या मुलीच्या लग्नाला चाकणकर उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर चाकणकरांच्या घरात खरात यांची भाची राहते. प्रस्तुत प्रकरणात अनेक महिलांचे लैंगिक शोषण झाले आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली पाहिजे. त्या फरार होण्यापूर्वी त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांनी यापूर्वीही आपल्या पदाचा दुरुपयोग करून या प्रकरणी अनेकांवर दबाव आणला आहे. त्या मध्यरात्री 2-2 वाजता फोन करून पीडितांना धमकी देत होत्या. त्यामुळे त्यांचा सीडीआर तपासला गेला पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांची नार्को टेस्ट केली गेली पाहिजे, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
