सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. या नाट्यमय घडामोडींमुळे जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना या निकालाने मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपने 32 सदस्यांचे संख्याबळ दाखवत अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड केली. उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी अखेरपर्यंत जोरदार प्रयत्न करूनही केवळ 31 सदस्यच एकत्र करू शकले. त्यामुळे बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले आणि सत्ता हातातून निसटली. देसाई यांच्या हाताला दुखापत दरम्यान, बहुमत नसतानाही भाजपने विरोधी पक्षातील सदस्यांना फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. काही सदस्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा कथित डाव आखल्याचीही चर्चा होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांच्या नजरेत असलेल्या सदस्यांना स्वतःच्या वाहनातून सुरक्षित सभागृहात पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडली. या गडबडीत झालेल्या झटापटीत देसाई यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही समोर आले. शिवसेनेने सदस्य एकत्र ठेवण्यासाठी ताकद लावली तसेच मकरंद पाटील यांच्या वाहनातूनही काही सदस्यांना सभागृहात आणण्यात आले. कामेस कांबळे, अनिल देसाई यांच्यासह काही सदस्यांना लक्ष्य करण्यात आल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपले सर्व सदस्य एकत्र ठेवण्यासाठी पूर्ण ताकद लावली. तरीही शेवटच्या क्षणी झालेल्या घडामोडींमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. साताऱ्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली संख्याबळाचा विचार करता, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 20, शिवसेनेकडे 15, काँग्रेसकडे 1, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे 1, भाजपकडे 27 आणि एक अपक्ष सदस्य असे एकूण 65 सदस्य होते. बहुमतासाठी 33 सदस्यांची गरज होती. भाजपच्या बैठकीला 28 सदस्य उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीचे 2 आणि शिवसेनेचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा असून त्यामुळे भाजपची संख्या 32 वर पोहोचली. या संपूर्ण घडामोडींमुळे साताऱ्यातील सत्तासमीकरणे पूर्णपणे बदलली असून फोडाफोडीच्या राजकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. निवड प्रक्रियेतील महत्त्वाच्या घडामोडी
