खरात प्रकरणात दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर:जयंत पाटील यांना सहआरोपी करावे असे रोहित पवारांना वाटते का? परांजपेंचा सवाल

भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी गट या मुद्द्यावरून एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांना सहआरोपी करण्याची मागणी केल्यानंतर, अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी जोरदार पलटवार केला आहे. आनंद परांजपे म्हणाले की, शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार यांच्या सांगण्यावरणं विकास लवांडे यांनी हा आरोप केला नाही ना? अशी शंका मला येते. त्यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे होते. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे अनेक फोटो आणि भेटी भोंदू अशोक खरातसोबत झाल्या आहेत. त्यात जयंत पाटील यांना सुद्धा सहआरोपी करावे अशी मंशा रोहित पवारांची आहे का? अशी भावना माझ्या मनात येते. दुसऱ्याचे वाकून बघायची प्रवृत्ती लवांडेंच्या आरोपांना उत्तर देताना आनंद परांजपे यांनी अत्यंत तिखट शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या बघायचे वाकून ही त्यांची प्रवृत्ती आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी विधानसभेत आधीच स्पष्ट केले आहे की, खरातला मदत करणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रत्येक व्यक्तीची कठोर चौकशी होईल. मला तर ही शंका येते की आमदार रोहित पवारांच्या सांगण्यावरून त्यांनी हा आरोप केला नाही ना? असा सवालही त्यांनी केला आहे. खरातवर कारवाई झालीच पाहिजे रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी कालच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचे परांजपे यांनी नमूद केले. भोंदू बाबावर कडक कारवाई झालीच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, राजकीय हेतूने कोणालाही अडकवण्याचे प्रयत्न खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. लवांडेंची मागणी काय? रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देऊन काही होणार नाही. यांना खरात प्रकरणात सहआरोपी करण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सुनील तटकरे यांना देखील सहआरोपी करण गरजेचं आहे, अशी मागणी या प्रकरणात शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी केली होती.

Leave a Comment

error: Content is protected !!