देशातील एका मोठ्या भागाच्या सॅटेलाइट छायाचित्रांमधून नैऋत्य मोसमी पावसाचे (मान्सूनचे) ढग गायब होऊ लागले आहेत. त्याच वेळी, दक्षिण आणि मध्य भारताच्या अनेक भागांत मान्सून दाखल झाला असला तरी देशातील मोठ्या भूभागावर पावसात मोठी घट नोंदवली गेली आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 4 ते 15 जूनदरम्यान देशात केवळ 19.2 मिमी पाऊस झाला आहे. तर या कालावधीसाठी सरासरी पाऊस 53.7 मिमी मानला जातो. म्हणजेच, देशभरात आतापर्यंत 64% कमी पावसाची नोंद झाली आहे. 15 जून रोजी इनसॅट-3डीएस उपग्रहाद्वारे घेण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये स्थिती अधिक स्पष्ट दिसते. सक्रिय मान्सूनदरम्यान सहसा दिसणाऱ्या ढगांच्या व्यापक पट्ट्याऐवजी द्वीपकल्पीय आणि मध्य भारताचा मोठा भाग जवळपास निरभ्र दिसत आहे. ढगांची सर्वाधिक हालचाल हिमालयीन प्रदेश, ईशान्य भारत आणि इंडो-गंगेच्या मैदानी प्रदेशाच्या उत्तरेकडे केंद्रित आहे. मान्सून 8 दिवसांपासून कोकणातच; ‘आयओडी’च्या प्रतिकूल स्थितीमुळे महाराष्ट्रात चिंता छत्रपती संभाजीनगर | मान्सून 8 दिवसांपासून कोकणातच रखडला आहे. तज्ज्ञांच्या मते अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग मंदावणे आणि प्रादेशिक हवामान प्रणालीत अपेक्षित अनुकूल बदल न होणे हे मान्सून रखडण्याचे मुख्य कारण आहे. इंडियन ओशन डायपोल आयओडी सकारात्मक नसल्याने चिंता आहे. पण जुलै, ऑगस्टमध्ये महाराष्ट्रात दमदार पाऊस पडेल, असे जपानच्या प्रतिष्ठित हवामान संस्था जेएमएने स्पष्ट केले आहे. पश्चिमी जेट स्ट्रीममुळे व्यापक पाऊस नाही हवामान तज्ज्ञांच्या मते, या समस्येचे मुख्य कारण वातावरणात वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह (पश्चिमी जेट स्ट्रीम) आहे. पूर्वेकडील वारे मान्सून सक्रिय ठेवणाऱ्या प्रमुख यंत्रणांपैकी एक आहेत. सर्वसाधारण परिस्थितीत पूर्वेकडील जेट स्ट्रीम वातावरणात वर जाणाऱ्या वाऱ्यांना चालना देऊन संपूर्ण उपखंडात मेघगर्जना, वादळ आणि पावसाच्या हालचाली सक्रिय करते. सध्या सरासरीपेक्षा अधिक मजबूत पश्चिमी वारे ही प्रक्रिया दाबत आहेत. परिणामी, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात पुरेशी आर्द्रता असूनही ढग विकसित होत नाहीत आणि व्यापक पाऊस पडत नाही. पुढे काय… आठवड्याच्या अखेरीस स्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा… हवामान मॉडेल्सनुसार 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, मध्य भारताच्या इतर भागांत पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. पावसाची स्थिती चिंताजनक.
नकाशामध्ये मध्य, दक्षिण व पूर्व भारताचे मोठे भाग पिवळ्या व लाल रंगात आहेत. हे सरासरीपेक्षा कमी व अत्यंत कमी पाऊस दर्शवतात. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र सध्या इंडियन ओशन डायपोल तटस्थ ते थोडा प्रतिकूल स्थितीत आहे. त्याचा परिणाम मान्सूनच्या पुढील प्रवासावर होताना दिसत आहे. 18 रोजी वातावरणात काही बदल अपेक्षित असल्यामुळे मराठवाड्यात हलक्या ते मध्यम पाऊस शक्य आहे. जागतिक स्तरावर एल निनोची तीव्रता दिसून येत आहे.
