सामाजिक एकतेचा ‘धडाकेबाज’ संदेश!
सुरेश पाभाई | मारेगाव
मारेगाव नगरीत रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने यंदा अक्षरशः इतिहास रचला. श्रीराम नवमी उत्सव समिती आणि बजरंग दल, मारेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या मिरवणुकीत हजारोंच्या जनसागराने उसळ घेत शहरात सामाजिक एकतेचे अद्वितीय दर्शन घडवले.
२६ मार्च रोजी सायंकाळी शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेची सुरुवातच जल्लोषात झाली. ढोल-ताशांच्या कडकडाटात, जय श्रीरामच्या घोषणांनी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण वातावरण भारून गेले होते. रामायणातील प्रसंगांचे सजीव देखावे हे या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. प्रभू श्रीरामांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना पाहून नागरिक मंत्रमुग्ध झाले.
या शोभायात्रेचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंगल वाद्यांच्या गजरात मिरवणुकीची शोभा वाढवली, तर लहानग्यांच्या उत्साहाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवात सहभाग घेतला.

दरम्यान, स्वयंसेवकांनी घेतलेली शिस्त आणि नियोजन यामुळे इतक्या मोठ्या मिरवणुकीतही कुठेही गोंधळ किंवा अनुशासनभंग झाल्याचे दिसून आले नाही. ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले, तर मिरवणूक पुढे सरकल्यानंतरही स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात आली.
एकूणच, मारेगावातील ही शोभायात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता सामाजिक ऐक्य, संस्कृती जतन आणि शिस्तीचा आदर्श ठरली.
