शिवसेनेच्या चक्काजामने प्रशासनाला ‘खडबडून’ जाग – दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात
सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव तालुक्यातील मार्डी–वणी मार्गावरील मच्छिंद्रा परिसरातील फिसकी जंगलातील रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला होता. खोल खड्डे, खचलेले कडे आणि धोकादायक साईड पट्ट्यांमुळे दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता. वारंवार अपघात घडत असल्याने परिसरात भीतीचे सावट होते. मात्र प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे संताप उसळला आणि अखेर रस्त्यावरच लढा पेटला!

दि. २० मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट चक्काजाम आंदोलन छेडले. “आता नाही तर कधीच नाही!” या भूमिकेत उतरलेल्या शिवसैनिकांनी रस्ता रोखून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि प्रशासनाची झोप उडाली.
यापूर्वी अनेकदा निवेदन देऊनही संबंधित बांधकाम विभागाने केवळ दिखावूपुरते मुरूम टाकून काम झाल्याचे नाटक केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. “नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!” असा ठणकावून इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याची तयारीही दर्शवण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व तालुका प्रमुख विशाल किन्हेकर आणि समन्वयक संजय आवारी यांनी केले. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत आंदोलनाने जोर पकडला आणि अखेर प्रशासनाला नमते घ्यावे लागले.
वाढता दबाव पाहता प्रशासनाने तातडीने लेखी आश्वासन देत फिसकी जंगलातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मुरूम टाकून दुरुस्ती सुरू करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे, तर १ एप्रिलपासून पॅचवर्क (सीलिंग) काम हाती घेतले जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

आश्चर्य म्हणजे, आंदोलन होताच प्रशासनाला खडबडून जाग आली आणि दुसऱ्याच दिवशी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल होताच काम सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

या वेळी उपविभागीय अभियंता केतन परतानी, नायब तहसीलदार विजय मत्ते, ठाणेदार श्याम वानखेडे व बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवत होते.
एकूणच, जनतेच्या आक्रोशाला आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेला प्रशासनाने अखेर प्रतिसाद दिला असून ‘आंदोलन केल्याशिवाय काम होत नाही’ हीच वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे!
