‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’:या शब्दांमुळे माझे बांधव दुखावले असतील तर क्षमा करा- शरद पोंक्षे

‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले होते. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे. मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती, या शब्दामुळे जर माझे बंधू-बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पोंक्षे यांनी आपली बाजू एका व्हिडिओच्या माध्यमातून मांडली आहे. ते म्हणाले, सध्या माझे एक वक्तव्य मीडिया फिरवत आहे. अशी नेहमीच माझी वक्तव्य तोडून-मोडून फोडून मीडियावाले फिरवत असतात. संपूर्ण भाषण कोणी कधी दाखवत नाही. माझ्या भाषणातले मागचे पुढचे सगळे कापून त्यामुळे समाजात वाद कसा निर्माण होईल, याबद्दल काळजी घेऊन नेहमी माझी वक्तव्य टाकत असतात. पुढे बोलताना शरद पोंक्षे म्हणाले, माझी दोन वक्तव्य त्यांनी चालवलेली आहेत. एक मी आरएसएसबद्दल बोललेलो आणि दुसरे मनुस्मृती जर वाचली असती, तर ती जाळली नसती, असे मी बोललो. आता हे बोलण्याचा माझा उद्देश असा आहे की, हिंदुत्व या विषयावर बोलत असताना, हिंदू धर्मातील जे सगळे धर्मग्रंथ आहेत, भगवद्गीता आहे, रामायण आहे, तर हे सगळे आपण वाचतच नाहीये. हे जर वाचले तर तुम्हाला कळेल की त्याच्यामध्ये नेमके काय म्हटले आहे. हा माझ्या मूळ उद्देश आहे. त्यामुळे मी असे म्हटले असल्याचे स्पष्टीकरण पोंक्षे यांनी दिले आहे. हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केला तसेच सगळे वेद, उपनिषद संपूर्ण भाषण युट्युबवर उपलब्ध आहेत, तुम्ही ते बघू शकता. मनुस्मृती मूळ जर वाचली, त्याची अनेक रूपं झाली. आता बाबासाहेबांनी मनुस्मृती जरी जाळली तरी त्यांनी हिंदू कोड बिल बनवताना मनुस्मृतीचा वापर केलेला आहे, हे त्यांनी स्वतः म्हटले आहे, असेही शरद पोंक्षे यांनी यावेळी म्हटले. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही शरद पोंक्षे म्हणाले, मी सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा अभ्यास करत आहे. खरे बाबासाहेब लोकांपर्यंत पोहोचावेत, कळावेत, ते कसे होते, ते सांगण्यासाठी माझी धडपड सुरु आहे. काही दिवसांनी ते तुम्हाला दिसेल. ‘मूळ मनुस्मृती वाचली असती तर ती जाळली नसती’, या शब्दामुळे जर माझे बंधू -बांधव दुखावले गेले असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो माझा मूळ हेतू आणि मूळ उद्दिष्ट हे आहे की, हिंदू धर्मातील सर्व जाती, पंथ यांच्या भिंती संपून आपण एक हिंदू म्हणून, एक भारतीय म्हणून वज्रमूठ म्हणून एकत्र राहायला पाहिजे हा माझा मूळ हेतू आहे. माझी सगळी व्याख्यानं तुम्ही ऐकू शकता, मी कधी काही लपवत नाही. माझी जास्त व्याख्यानं बहुजन समाजातीलच लोक ठेवतात. काही लोक बावळटासारख्या प्रतिक्रिया देत असतात. पण माझ्या काही चांगल्या मित्रांनी प्रतिक्रिया दिल्यामुळे मला असे वाटले की, एक व्हिडीओ करावा आणि दिलगिरी व्यक्त करावी. मुळात मी बाबासाहेबांचा, सगळ्या महापुरुषांचा अत्यंत आदर करणारा माणूस आहे. बोलण्याच्या ओघात कधीतरी शब्द निघून जातो. त्यामुळे मनुस्मृतीबाबतच्या वाक्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी मनापासून माफी मागतो, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!