नितेश क्षीरसागर कळंब | प्रतिनिधी
कळंब येथील शिवशक्ती उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज दि. १ एप्रिल २०२६ रोजी उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवशक्ती शिक्षण संस्थेचे व्यवस्थापक बाळासाहेब धांदे होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय वरगंटवार, प्रा. निलेश दुबे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आशिष महाजन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रास्ताविक कु. केशवी निमसटकर हिने सादर करत निरोप समारंभाचे महत्त्व स्पष्ट केले. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील आठवणींना उजाळा देत भावनिक वातावरण निर्माण केले.

मुख्याध्यापक आशिष महाजन यांनी शिक्षक-विद्यार्थी नात्याचा उल्लेख करत, विद्यार्थ्यांपासून दूर जाताना शिक्षकांनाही तितकाच भावनिक अनुभव येतो, असे सांगितले. अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब धांदे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत शाळेत मिळालेली संस्कारांची शिदोरी आयुष्यभर उपयोगी पडेल, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रथमेश दरवेकर व कु. स्वरा देवघरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. दर्शना इजपाडे हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रविण देशमुख, मनोज शिवरकर, मयुर होले, कु. चंद्रभागा मेश्राम, कु. शालू सदाफळे, सौ. प्रांजली दरणे, शिवम चांदोरे व विठ्ठल राठोड यांनी परिश्रम घेतले.
