शेतीमध्ये वाढता उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण हा एकमेव खात्रीशीर मार्ग आहे. हेच ओळखून कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत आगीखेड (ता. बार्शीटाकळी) येथील शेतकऱ्यांना माती परीक्षण आणि त्यानुसार खत व्यवस्थापन कसे करावे, याचे मार्गदर्शन केले. गेल्या काही वर्षांत रासायनिक खतांच्या अवाजवी वापरामुळे जमिनीचा पोत बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘प्रयोगशाळा ते शिवार’ हा संदेश घेऊन कृषी विद्यार्थिनींनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला. यावेळी विद्यार्थिनींनी शेतातून मातीचा नमुना घेण्याची शास्त्रीय पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे समजावून सांगितली. इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा खोदून, त्यातील वरचा थर बाजूला सारून कडेची माती कशी गोळा करावी, याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. या उपक्रमात आगीखेड परिसरातील अनेक प्रगतशील शेतकरी सहभागी झाले. विद्यार्थिनींनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकामुळे माती परीक्षणाबाबत असलेल्या शंकांचे निरसन झाल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या मार्गदर्शनामुळे आगामी खरीप हंगामात खतांचे नियोजन करणे सोपे जाईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी दर्शवला. या उपक्रमासाठी स्थानिक ग्रामस्थांचे आणि कृषी महाविद्यालयाच्या मार्गदर्शक प्राध्यापकांचे सहकार्य लाभले. खत बचतीचा दिला कानमंत्र माती परीक्षणामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची नेमकी पातळी समजते. यामुळे ज्या घटकाची कमतरता आहे, तेवढेच खत दिल्याने शेतकऱ्यांच्या पैशांची मोठी बचत होते, हे विद्यार्थिनींनी आकडेवारीसह शेतकऱ्यांना यावेळी पटवून दिले. “मातीचे आरोग्य सुधारल्याशिवाय उत्पादनात शाश्वत वाढ होणे शक्य नाही,’ असा सल्लाही प्रात्यक्षिकांसह यावेळी विद्यार्थिनींकडून शेतकऱ्यांना देण्यात आला.
