मुंबईकरांच्या खिशाला कात्री, रेल्वे स्थानकांवरील वडापाव-समोशाच्या दरात मोठी वाढ:13 रुपयांचा वडापाव 1 जूनपासून 20 रुपयांना

मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेला वडापाव आता अधिक महाग होणार आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील खाद्यपदार्थांच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून 1 जून 2026 पासून हे नवे दर लागू होणार आहेत. यामुळे रोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. विशेष म्हणजे वडापाव, समोसा आणि रगडा पाव यांसारख्या सर्वसामान्यांच्या आवडीच्या पदार्थांच्या किंमतीत थेट मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोज हजारो लोक काम, शिक्षण आणि व्यवसायासाठी लोकल रेल्वेचा आधार घेतात. या धावपळीच्या जीवनात रेल्वे स्थानकांवरील वडापाव हा अनेकांचा झटपट आणि स्वस्त पर्याय मानला जातो. मात्र आता याच वडापावसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. मध्य रेल्वेच्या स्टॉल्सवर सध्या 13 रुपयांना मिळणारा वडापाव 1 जूनपासून 20 रुपयांना विकला जाणार आहे. म्हणजेच एका वडापावमागे थेट 7 रुपयांची वाढ होणार आहे. वडापावसोबतच समोसाही आता महागणार आहे. रेल्वे स्थानकांवर मिळणाऱ्या समोशाची किंमत 12 रुपयांवरून थेट 20 रुपये करण्यात आली आहे. तसेच रगडा पावसाठीही प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या 20 रुपयांना मिळणारा रगडा पाव आता 25 रुपयांना उपलब्ध होणार आहे. या दरवाढीमुळे रोज प्रवास करणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यावर अतिरिक्त खर्चाचा ताण येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रेल्वे प्रशासनाने केवळ दरवाढच केली नाही, तर स्टॉलवरील मेन्यूमध्येही काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांसाठी आता स्लश ड्रिंक्स, क्रीम डोनट्स, सूप, डोसा आणि नूडल्स यांसारखे नवीन पदार्थ उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. तसेच काही खाद्यपदार्थांच्या प्रमाणातही बदल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, एलपीजी सिलिंडरच्या किंमती आणि इतर खर्च वाढल्यामुळे ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे सांगितले जात आहे. दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दरम्यान, सर्व खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या असल्या तरी काही उत्पादनांना दिलासा देण्यात आला आहे. ज्यूस आणि सोडा उत्पादनांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मात्र वडापाव आणि समोसासारख्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पदार्थांच्या दरवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांचा दैनंदिन खर्च वाढणार असून, 1 जूनपासून स्थानकांवरील खाद्यपदार्थ खरेदी करताना प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!