नांदेड गँगवॉरने हादरले, मध्यरात्री 3 जणांचा मर्डर:अगोदर टोळीच्या म्होरक्याचा मर्डर, नंतर रुग्णालयात जाऊन 2 जखमींची केली हत्या

गत काही महिन्यांपासून वेगवेगळ्या गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत असणारे नांदेड शहर शुक्रवारी पुन्हा एकदा रक्तरंजित गँगवॉरने हादरले. ताज्या घटनेत 3 जणांची निर्घृण हत्या झाली असून, 3 जण गंभीर जखमी झालेत. दोन टोळ्यांतील जुन्या वैमनस्यातून ही घटना घडली. पण रस्त्यावर झालेला हा वाद नंतर थेट रुग्णालयापर्यंत पोहोचला आणि परिस्थिती आणखी चिघळली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, नांदेड शहरातील डी मार्ट परिसरात असलेल्या ई-स्वेअरलगत शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास 2 टोळ्यांत वाद झाला. त्यावेळी अरिजितसिंग चव्हाण हा धुरंधर-2 चित्रपट पाहून घराकडे जात होता. त्याच्यावर सय्यद आवेज सय्यद खलील, घनश्याम रेड्डी, मोहम्मद अरबाज व इतर काही हल्लेखोरांनी तलवार व खंजीरने हल्ला केला. त्यात 25 वर्षीय अरिजितसिंग चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या घटनेत जखमी झालेल्या सय्यद आवेज, सय्यद खलील व इतर एकाला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिकडे हल्लेखोरांना सरकारी दवाखान्यात दाखल केल्याची गोष्ट अरिजितसिंग चव्हाणच्या भावाला समजली. त्यानंतर त्याने तत्काळ रुग्णालयाच्या धाव घेतली. तिथे त्याने जखमी सय्यद आवेज सय्यद खलील (27) व मोहम्मद अरबाज मोहम्मद फारुख (23) या दोघांवर धारदार चाकूने हल्ला केला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालयात एकच हल्लकल्लोळ माजला. पोलिसांनी काय दिली माहिती? पोलिसांनी या घटनेविषयी सांगितले की, शुक्रवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील दोन्ही टोळ्यांची मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एका टोळीचा सदस्य अनिल पंजाबी हा सध्या तुरुंगात आहे. तर साहिल 2 महिन्यांपूर्वीच तुरुंगाबाहेर आला होता. त्याच्यावर यापूर्वीही कारवाई झाली होती. दुसरीडे, मृत अरिजितसिंग चव्हाणवर तब्बल 9 गुन्हे दाखल होते. त्याच्यासोबत आणखी एक जण होता. त्याला आम्ही ताब्यात घेतले आहे. प्रस्तुत घटनेत अरिजितसिंग चव्हाणसह अरबाज व आवेज या दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अरबाज, आवेजसह इतर एक जण गंभीर जखमी झाला होता. त्याला गंभीरावस्थेत विष्णुपुरी स्थित सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. अरिजितचा मृतदेहही तिथेच होता. त्यामुळे त्याचा भाऊ व वडिल तिथेच होते. त्याच्या भावाने तिथेच जखमींवर चाकू हल्ला केला. त्यात दोघेही ठार झाले. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केलेत. या प्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!