पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे महाराष्ट्राच्या वीज निर्मिती कंपनीला (महाजेनको) स्वतःच्या मालकीची कोळसा खाण प्राप्त झाली असून, यामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता वाढण्यासोबतच उत्पादन खर्चही कमी होणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्तीसगडमधील गरे पाल्मा या खाणीतून कोळशाची पहिली खेप रवाना झाल्यानंतर ते बोलत होते. सीएम देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कुठेही लोडशेडिंग नाही. आता 70 टक्के शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं सुरू केले आहे. मराठा आंदोलकावरील कुठलाही गुन्हा मागे घेण्यास नकार देण्यात आलेला नाही. तशी काही बैठक सुद्धा झाली नाही. शासकीय संपत्तीचे जिथे नुकसान झाले ते गुन्हे मागे घेता येत नाही हे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत. ते सोडून आम्ही सर्व गुन्हे मागे घेत आहोत. किती गुन्हे मागे घेतले याची माहिती मी अधिवेशनामध्ये आकडेवारी दिली. 77 वर्षांची चिंता मिटली देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या वीज निर्मितीसाठी प्रामुख्याने 2800 ते 3200 GCV असलेला कोळसा उपलब्ध होतो. मात्र, महाजेनकोच्या मालकीच्या या खाणीतून 4300 GCV चा उच्च दर्जाचा कोळसा मिळणार आहे. कोळशाची प्रत सुधारल्याने तुलनेने कमी कोळशात अधिक वीज निर्मिती शक्य होणार आहे, ज्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होईल. मी मुख्यमंत्री आणि चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जामंत्री असताना या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या खाणीचे आयुष्य पुढील 77 वर्षे असून, यामुळे महाराष्ट्राची कोळशाची चिंता कायमची मिटली आहे. या खाणीमुळे कोळशावरील अवलंबित्व कमी होऊन राज्याला शाश्वत ऊर्जा स्त्रोत प्राप्त झाला आहे.
राहुल गांधींविरोधात काँग्रेसमध्ये नाराजी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राहुल गांधी हे स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना जे कायम पराभवाला सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित केली जात आहे. आपले नेतृत्व कायम रहावे म्हणून त्यांच्याकडून हे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस पक्षांतर्गत त्यांना मोठा विरोध होत आहे, तो विषयाकडे दुर्लक्ष व्हावे यासाठी ते काही वक्तव्य करत आहेत. कोणालाही सोडणार नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या मुळाशी आम्ही जाणार आहोत. त्यातील दोषींना कुठल्याही परिस्थितीमध्ये कठोर शिक्षा देण्यात येईल.
