सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर निशाणा साधला होता. या प्रकरणी त्यांनी उद्धव ठाकरे यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काय केले? असा खोचक सवाल उपस्थित केला होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी शिंदेंच्या 2020 मधील एका ट्विटचा दाखला देत ठाकरेंनी मुंबईसाठी काय केले हे दाखवून दिले आहे. तसेच शिंदेंना ही पोस्ट डिलीट न करण्याची गळही घातली आहे. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याची घोषणा केली आहे. यामुळे महायुतीचे मुंबईतील राजकीय समीकरण बिघडल्याचा दावा केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी ठाकरे बंधूंवर निशाणा साधत त्यांनी मुंबई व तेथील मराठी माणसांसाठी काहीच केले नसल्याचा दावा केला होता. त्यांच्या या टीकेनंतर सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांची एक जुनी पोस्ट पोस्ट शेअर केली आहे. फक्त पोस्ट डिलीट करू नका – सुषमा अंधारे उद्धव साहेबांनी मुंबई आणि मुंबईतल्या मराठी माणसासाठी काय केलं याचा लेखाजोखा तुम्ही स्वतः मांडत आहात. फक्त पोस्ट डिलीट करू नका तुम्हाला तुमचे गुरु आनंद दिघे यांची शपथ आहे, असे सुषमा अंधारे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाली. आध्यात्मिक समागम आहे का? सुषमा अंधारेंनी अन्य एका ट्विटद्वारे भाजपवरही निशाणा साधला. ठाकरेंनी युती केली म्हणजे सत्तेसाठी असं जर फडणवीसंच म्हणणं असेल तर मग अजित पवार अशोक चव्हाण आणि शिंदे सोबत असणारे तमाम भ्रष्टाचारी यांच्यासोबत भाजपने केलेली युती म्हणजे काय आध्यात्मिक समागम आहे का? असा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला. काय आहे एकनाथ शिंदेंच्या पोस्टमध्ये? एकनाथ शिंदे आपल्या 23 फेब्रुवारी 2020 च्या पोस्टमध्ये म्हणतात, गिरणी कामगारांच्या घरांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. याप्रसंगी पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे,मुख्य सचिव अजोय मेहता,गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर उपस्थित होते. म्हाडाच्या मुंबईतील 3900 घरांची लॉटरी प्रक्रिया 1 मार्चपासून आणि MMRDA च्या रेंटल हाऊसिंग स्कीममधील 2000 हून अधिक घरांची लॉटरी प्रक्रिया 1 एप्रिल पासून सुरुवात करण्याचे निर्देश मा. मुख्यमंत्री यांनी दिले. ठाणे परिसरातील 36 हेक्टर जागा गिरणी कामगारांच्या घरासाठी हस्तांतरित करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले. शिंदेंनी ठाकरे बंधूंवर काय केली होती टीका? एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर टीका करताना म्हणाले होते, लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जनतेचा महायुतीला कौल मिळाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी झालेल्या युत्यांमुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. यांनी मुंबई महापालिकेकडे सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले. आता ती कोंबडीच कापून खाण्याचे काम सुरू आहे. ठाकरे बंधूंची युती ही स्वार्थासाठी आणि स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी आहे. जनता त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवेल. युती झाली तरी विठ्ठल आमच्याकडे आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेत मुंबईच्या विकासावर एक शब्दही बोलला गेला नाही. त्यांच्याकडे मुंबईच्या विकासाचा अजेंडा नाही. यांचा अजेंडा फक्त सत्तेसाठी आहे. बाळासाहेबांचा विचार ज्यांनी सोडला, त्यांना जनतेने आधीच त्यांची जागा दाखवली आहे. असली आणि नकली काय, हे नगरपालिकेच्या निवडणुकांत स्पष्ट झाले. आमचा अजेंडा स्पष्ट आहे, मुंबईचा विकास. त्यांनी मुंबईसाठी नेमकं काय केले हे सांगावे. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला, त्याला हेच जबाबदार आहेत. त्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. रमाबाई आंबेडकर नगरमधील 17 हजार घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावला आहे. त्यांच्या अजेंडामध्ये असे काय आहे? असा सवाल शिंदेंनी केला. निवडणुका आल्या की, ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असे फलक लावले जातात. पण मुंबईकर सुज्ञ आहेत. त्यांना विकास हवा आहे. आमचे निर्णय मुंबईकरांच्या हिताचे आहेत. पुढील सहा महिन्यांत मुंबई खड्डेमुक्त होईल. कोरोनाच्या काळात फक्त पैसे खाल्ले गेले. जे स्वतःच्या पोरांना सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
