पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला इंधन बचतीसाठी काटकसर करण्याचे आवाहन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने त्याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. आता राज्यातील मंत्र्यांना सरकारी विमानाचा वापर करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लेखी मंजुरी घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही मंत्र्याला विमान वापरता येणार नाही, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने उपरोक्त निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? या निर्णयाबाबत माहिती देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “एखाद्यावेळी तातडीने कुठे जायचं असेल तर मी विमान वापरतो. माझ्या वर्षभरात चार-पाच वेळा तातडीचे काम असते तेव्हाच विमानाने जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप व्यस्त असतात, म्हणून ते विमान वापरतात. आता मुख्यमंत्र्यांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. तसेच माझ्या जास्तीत जास्त बैठका ऑनलाइन असतात. मी जिल्हाधिकारी, अधिकाऱ्यांना बोलवत नाही. मी ऑनलाइन बैठका घेऊन तोडगा काढतो.” मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर नीतेश राणेंच्या विभागाला सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांनीही आपापल्या विभागात बदलांचे वारे सुरू केले आहेत. मंत्री नीतेश राणे यांनी मत्स्य विकास व बंदर विभागाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. या विभागाच्या सर्व बैठका आता प्रत्यक्ष न घेता ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जातील. यामुळे अधिकाऱ्यांचा प्रवास खर्च आणि वेळेची बचत होणार आहे. केवळ बैठकाच नाही, तर वाहतुकीच्या साधनांमध्येही बदल करण्याचे आदेश नीतेश राणे यांनी दिले आहेत. विभागातील अधिकाऱ्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्यांऐवजी आता इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे इंधनावरील खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक कामकाजाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोदींच्या आवाहनानंतर मंत्री आशिष शेलार यांचेही तीन निर्णय दरम्यान, पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. जागतिक चित्रपट महोत्सवासाठी (Cannes) विभागाकडून कोणाही प्रतिनिधीने जाऊ नये, असा निर्णय घेण्यात आला आहे. विभागाच्या कामकाजासाठी इंधनावरील वाहने टाळून केवळ इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर केला जाईल. उद्यापासून माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक विभागाच्या सर्व बैठका प्रत्यक्ष न होता ऑनलाइन स्वरूपात पार पडतील, जेणेकरून प्रवासावरील इंधन खर्च वाचवता येईल, असे निर्णय मंत्री आशिष शेलार यांनी घेतले आहेत. पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केले? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. हे ही वाचा… पंतप्रधान मोदींत देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही:त्यांनी जनतेला सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतूनच दूर व्हावे, नाना पटोले यांचा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आता देश चालवण्याचे सामर्थ्य राहिले नाही. त्यामुळे त्यांनी जनतेला काटकसरीचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःच सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. सविस्तर वाचा…
