आधी बाहेर पडले नाहीत, आता वरातीमागून घोडे फिरत आहेत:ती शिवसेना नाही, तर शिव्यांची सेना झालीय; शिंदेंची ठाकरेंवर टीका

“आता वरातीमागून घोडे फिरवण्याचे काम सुरू आहे, त्यावर मी योग्य वेळी सविस्तर बोलेन. जे लोक पूर्वी साधे घरातसुद्धा कोणाला भेटत नव्हते, ते आता राजकीय फायद्यासाठी थेट लोकांच्या दारात जात आहेत,” अशा तीव्र शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला. “ती शिवसेना राहिलेली नसून ती ‘शिव्यांची सेना’ झाली आहे,” अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली. ठाण्यातील एका विशेष कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या राजकीय शैलीवर उपरोधिक टोला लगावला. ते म्हणाले, “पूर्वी ‘एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन’ अशी थेट युद्धाची भाषा करणारे लोक आता अचानक मवाळ बनून ‘पुतनामावशीचे प्रेम’ दाखवायला लागले आहेत. मात्र, जनता आता या ढोंगाला भुलणार नाही. आमचा अजेंडा खुर्ची मिळवणे हा कधीच नव्हता, तर सर्वसामान्य नागरिकांचा आणि महाराष्ट्राचा विकास करणे हाच आमचा एकमेव ध्यास आहे.” याच कार्यक्रमात त्यांनी ठाणे-पालघर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिंदे समर्थक पॅनेलला मिळालेल्या घवघवीत बहुमताबद्दल सर्व विजयी उमेदवारांचे विशेष अभिनंदन केले, तसेच खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. नांदेडच्या मातंग समाजातील कार्यकर्त्यांचा ‘शिंदेसेनेत’ प्रवेश नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाचे खंबीर नेते मारुती वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे ‘शिंदेसेनेत’ (शिवसेना) प्रवेश केला. यामध्ये ॲड. राम चव्हाण, सुरेश साळवे, सुदाम धुपे, राजेंद्र अडागळे, बाबूराव आंबेगावे, विष्णुराव गवळी आणि अरुण सूर्यवंशी या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारुती वाडेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत त्यांची ‘महासचिव/महाराष्ट्र समन्वयक’ पदावर अधिकृत नियुक्ती जाहीर केली. मातंग समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत करताना उपमुख्यमंत्र्यांनी समाजाच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “साहित्यरत्न लोकशाहेर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी आणि मातंग समाजाच्या तरुणांना हक्क मिळवून देण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना ‘आरती’ संस्थेची स्थापना केली.” “मी आणि देवेंद्रजींनी मिळून राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू केले होते, त्यानंतर अजितदादा (पवार) देखील या विकासयात्रेत सोबत आले. तुमच्या भावना समाजाला न्याय देण्याच्या आहेत आणि सरकार त्यासाठी सकारात्मक आहे.” मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लवकरच मुंबईत एक विशेष आणि सकारात्मक बैठक बोलावण्याचे आश्वासन दिले.

Leave a Comment

error: Content is protected !!