Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

केंद्राने महागाईच्या भडक्यात ‘घासलेट’ टाकले:निवडणुकांचा ‘सेल’ संपला, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू, विरोधकांचा घणाघात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी महाग झाले आहे. दिल्लीत आता पेट्रोल 97.77 रुपये प्रति लिटरने मिळेल. डिझेलची किंमत 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. नवीन दर आज 15 मे पासून लागू झाले आहेत. सुमारे 2 वर्षांनंतर दरांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारवर महागाईच्या भडक्यात घासलेट अर्थात रॉकेल ओतल्याची टीका केली आहे. सरकारचा स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न – आदित्य ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढलेत. ते म्हणाले, कॉम्प्रोमाईज इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने सरकार स्थापन झालं ते देशाला महागाई आणि आर्थिक संकटापासून सुरक्षित ठेवण्यासाठी; सत्तेत येऊन इतर देशांतील दरांशी तुलना करून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी नाही! सरकारचं काम राज्यकारभार चालवणं, हास्यास्पद तुलना करणे नाही. 2014 पूर्वी तुलना व्हायची ती विकासाची. आपल्यापेक्षा पुढे असलेल्या देशांपासून, प्रेरणा घेण्यासाठी. ती तुलना नेहमीच प्रोत्साहन देणारी होती. आज तुलना होते, इंधन दरांची, कायदा-सुव्यवस्थेच्या बोजवाऱ्याची, प्रशासनाच्या अपयशाची. आणि अशा देशांशी ज्यांचा भारतासोबत कधी उल्लेखही केला जात नव्हता. हीच खरी अधोगती आहे, असे ते म्हणालेत.
राष्ट्रप्रेमाखातीर त्यागाची पहीली पावती 3 रुपयांची – सतेज पाटील काँग्रेस नेते सतेज पाटील यांनीही या प्रकरणी सरकारवर तोंडसूख घेतले आहे. राष्ट्रप्रेमाखातीर त्यागाची पहीली पावती 3 रुपयांची. निवडणुकांपर्यंत “सब चंगा सी” होतं. निवडणुकांच्या प्रचारात वास्तविक प्रश्नांऐवजी देव, देश आणि धर्म धोक्यात आणून जनतेच्या भावनांना हात घालण्यात आला. लोकांनी मतदान केलं, निवडणुका संपल्या आणि आता जनतेचं राष्ट्रप्रेमासाठी “त्याग करावा” असा हट्ट! त्या राष्ट्रप्रेमासाठी त्यागाची पहिली पावती म्हणजे पेट्रोल आणि डीझेलवर 3 रुपयांची दरवाढ! जनतेने अजून किती सोसायचं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
निवडणुका जिंकण्याच्या नादाने देशाला महागाईच्या दरीत ढकलले – वडेट्टीवार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. आखाती देशांमधील युद्ध फेब्रुवारी महिन्यापासून सुरू आहे. काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महागाईचा संकटाबाबत तेव्हाच सरकारला सावध केले होते. मात्र, केवळ निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने वेळीच उपायोजना करण्याचे टाळले. जनतेला तब्बल 3 महिने मूर्ख बनवले. आता निवडणुका संपताच मोदी सरकारने देशावर महागाईचे संकट लादले आहे. CNG, व्यावसायिक गॅस, पेट्रोल, डिझेल, दूध अशी प्रत्येक जीवनावश्यक वस्तू आता महाग झाली आहे. केवळ निवडणुका जिंकण्याच्या हट्टापायी मोदी सरकारने संपूर्ण देशाला महागाईच्या दरीत ढकलले आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. आता खिसा कापणीचा महासेल सुरू – अंबादास दानवे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुकांचा ‘सेल’ संपलाय, आता खिसा कापणीचा ‘महासेल’ सुरू झालाय! ​निवडणुका संपेपर्यंत जे ‘दरबॉम्ब’ खिशात लपवून ठेवले होते, ते आता थेट जनतेच्या खिशावर पडू लागलेत. पंपावर रांगा लागल्यात आणि सरकारचं रेकॉर्ड मात्र तेच जुनं वाजतंय – “टंचाई कुठेही नाही!” ​लोक पंपावर पेट्रोल घ्यायला उभे आहेत, तर ‘महागाईचा महोत्सव’ साजरा करण्यासाठी नाही, असे ते म्हणालेत.

रोहित पवारांनी काढली मनमोहन सिंगांची आठवण रोहित पवार म्हणाले, डॉ. मनमोहन सिंग साहेबांच्या UPA सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रती बॅरल असतानाही तत्कालीन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझलचे दर 60 रुपयांच्या आसपास स्थिर ठेवून जनतेला महागाईची झळ लागू दिली नाही. पण 2014 नंतर भाजप सरकार आल्यापासून कच्च्या तेलाचे दर 110 डॉलर प्रती बॅरलवरुन सरासरी 60 डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले असतानाही देशांतर्गत पेट्रोल-डिझेलचे दर 60 रुपयांवरुन निम्म्याने कमी करण्याऐवजी उलट करांमध्ये 9 रुपयांवरुन 32 रुपये वाढ करुन केंद्र सरकारने ते 90 रुपये प्रती लिटरच्या आसपास नेऊन ठेवले आणि सामान्य जनतेच्या खिशावर अक्षरशः 10 लाख कोटी रुपयांचा डल्ला मारला. आज युद्धजन्य परिस्थितीत कच्च्या तेलाचे दर वाढताच 5 राज्यातील निवडणूक होईपर्यंत जीव मुठीत धरून ठेवलेल्या केंद्र सरकारने निवडणुकीचा स्वार्थ साधताच पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करुन नफेखोरी हाच आमचा धंदा असून जनतेशी काहीही देणंघेणं नाही, हेच दाखवून दिलं. ही दरवाढ भाजपच्या अंध भक्तांसाठी देशभक्ती असली तरी सामान्य माणसासाठी महागाईच्या भडक्यात टाकलेलं घासलेट आहे. देशवासीयांनो आता आवाज उठवायचा नसेल तर आपल्या हातात एकच गोष्ट शिल्लक आहे. निमूटपणे सहन करणं. पण मला अजूनही आशा आहे की, सरकारकडूनच जनतेची अशी लूट होत असताना सर्वजण व्यक्त होतील आणि आपला रोष दाखवून देतील, असे ते म्हणाले. निवडणुका संपल्या, आता वसुली सुरू शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. निवडणुका संपल्या… त्यामुळे आता मोदी सरकारची वसुली सुरू पेट्रोल आणि डिझेलचे दर 3-3 रुपयांनी वाढवले तर CNG च्या दरातही 2 रुपयांची वाढ करण्यात आली. हा प्रश्न फक्त पेट्रोल-डिझेलच्या 3 रुपयांच्या दरवाढीचा नाही, तर सतत वाढणाऱ्या महागाईच्या वाढत्या ओझ्याचा आहे. सद्या परिस्थिती अशी आहे की, एकीकडे जनतेचे खिसे रिकामे होत आहेत, तर दुसरीकडे भाषणांमधील ‘अच्छे दिन’ मात्र अजूनही सुरूच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!