पीएम 12 वर्षांच्या वनवासानंतर नेदरलँडमध्ये जाऊन सांगतात ‘बुरे दिन’ येणार:इराणशी संबंध ताणले, पेट्रोल 20 रुपयांनी महागणार, जितेंद्र आव्हाडांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि त्यांनी देशाला सांगितले की अच्छे दिन येणार आहेत. 12 वर्षांच्या वनवासानंतर (दुसऱ्या देशात) नेदरलँडमध्ये जाऊन म्हणाले की बुरे दिन येणार आहेत तयार रहा. वाईट दिवस येणार आहेत तर ते भारतात सांगा ना दुसऱ्या देशात का सांगत आहात?असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारगटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, बुरे दिन कोणावर येणार आहेत? पेट्रोल पुढच्या काही दिवसांमध्ये 20 रुपयांनी महागणार आहे. गरीब माणसांचे जगणं अवघड होणार आहे, तो या त्रासाने मरणार आहे. आजच ग्रामीण भागात पेट्रोल-डिझेल काहीही मिळत नाही. पाण्याचे पंप त्यावर चालतात. लोकांना तुम्ही जगवणार कसे, देश असा चालत नाही. बंगाल निवडणुकीपूर्वी काही समजले नाही का? जितेंद्र आव्हाड म्हणाले की, देशाच्या पंतप्रधानांनी कुठल्या उद्देशाने परदेश दौरे केले हे त्यांनाच माहिती. प्रश्न असा आहे की बंगाल निवडणुकीच्या पूर्वी का नाही सांगितले की देशाची परिस्थिती इतकी वाईट आहे ते. शरद पवारांनी जर सांगितले की देशाची परिस्थिती वाईट आहे तर सर्वांनी एकत्र आले पाहिजे तर यामध्ये गैर काय? बंगालच्या निवडणुकीनंतर तुम्हाला सर्व काही समजते का? पडळकरांच्या बुद्धीचे कौतुक करावे जितेंद्र आव्हाड म्हणाले की,आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय संबंध इतके ताणले गेले आहेत का की आपल्याला पेट्रोल मिळूच शकत नाही. इराण असा देश होता ज्याने आपल्याला रुपयामध्ये व्यवहार करण्याची संधी दिली होतीआणि आज तोच इराण आपल्या विरोधात वागतो आहे. जहाज येऊ देत नाही. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यांची कोणीही खिल्ली उडवू नये. त्यांना खूप ज्ञान आहे. त्यांच्या बुद्धीचे कौतुक करायला हवे.शरद पवार हे राहुल गांधी यांच्यासोबत आहेत. राहुल गांधी कुठेही एकटे पडत नाहीत. इंडिया आघाडीत फुट नाही- शिंदे शशिकांत शिंदे म्हणाले की, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले म्हणजे काही इंडिया आघाडीत फुट पडली असे होत नाही. देशहितासाठी काही वेळा गोष्टी कराव्या लागतात. यावेळी बोलताना पवारांनी हे सुद्धा सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे राजकीय मतभेद आहेत. इंडिया आघाडी मजबूत करण्याचे कामच शरद पवार यांनी केले आहे. सत्ताधाऱ्यांनी कसे वागायचे हे ठरवावे- शिंदे शशिकांत शिंदे म्हणाले की, पंतप्रधानांचे परदेश दौरे हे राष्ट्राचे हितसंबंध जपण्यासाठी होत असतात, असे शरद पवारांनी सांगितले आहे. त्याचा देशाला फायदा होतो. शरद पवार यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केल्यानंतर त्यांना काटकसरीबद्दल शरद पवारांनी सांगण्याची गरज नाही.सरकारमधील लोकांनी कसे वागावे ही त्यांनी ठरवले पाहिजे, तर पंतप्रधान यांनी ठरवावे. शरद पवार काय म्हणाले? नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. आमची वैचारिक भूमिका जरी वेगळी असली तरी आज ते जगात भारताची प्रतिमा जपण्याचे काम करत आहे, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींचे कौतुक केले आहे.शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांची आणि माझी राजकीय भूमिका वेगळी असू शकते पण आज देशाची प्रतिष्ठा जपण्याचे काम मोदी करताय हे विसरुन चालणार नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!