देशभरात सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरांनी सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून, आता या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी इंधन दरवाढीवरून सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा व्हॅट (VAT) आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिले आहे. जयंत पाटील यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपल्या पत्रातील मागण्या अधोरेखित केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने इंधनावरील कर आणि अतिरिक्त अधिभार (सरचार्ज) रद्द केल्यास पेट्रोल-डिझेलचे दर लक्षणीयरीत्या कमी होतील. याचा सकारात्मक परिणाम केवळ वाहनधारकांवरच नाही, तर वाहतूक व्यवस्था, शेतीची कामे आणि उद्योग क्षेत्रावरही होईल. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत जनतेच्या हिताचा विचार करून शासनाने हे कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रात काय म्हटले? जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, “आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे.” जयंत पाटील पत्रात पुढे लिहितात, “राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते. असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.” “आपण या सुचनेचा सकारात्मक विचार कराल व तात्काळ पेट्रोल डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रह करून नागरिकांना दिलासा द्याल, अशी अपेक्षा करतो,” असे जयंत पाटील यांनी पत्राच्या शेवटी म्हटले. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले! दरम्यान, इंधनाच्या दरात सलग होणाऱ्या वाढीमुळे महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यांना तातडीने दिलासा मिळणे ही काळाची गरज आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. या पत्रावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात आणि राज्य सरकार इंधनावरील करात कपात करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.