एखाद्या सस्पेन्स चित्रपटालाही लाजवेल अशी एक थरारक आणि तितकीच गोंधळात टाकणारी घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे. ज्या मुलीचा खून झाला म्हणून पोलिसांनी तिच्या वडील आणि भावाला बेड्या ठोकल्या, ज्यांनी आपला गुन्हाही कबूल केला, तीच मुलगी चक्क २० दिवसांनंतर पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. “मी जिवंत आहे, माझ्या वडील आणि भावाला सोडून द्या,” असे या मुलीने सांगितल्याने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात तरुणीचा शिरच्छेद केलेला मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना मध्य प्रदेशातील खकणार येथून शिवानी नावाची मुलगी बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवानीचे वडील बापूराव करमेकर आणि तिच्या भावाला ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे, पोलिस चौकशीत या दोघांनीही शिवानीची हत्या केल्याची कबुली दिली होती. या कबुली जबाबामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक करून कोठडीत रवानगी केली होती. मुलीच्या आगमनाने पोलिसही चक्रावले! पोलिस जळगावमध्ये सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ‘डीएनए’ चाचणीची तयारी करत असतानाच, खकणार पोलिस स्टेशनचे निरीक्षक अभिषेक जाधव यांचा जळगाव जामोद पोलिसांना फोन आला. त्यांनी दिलेली माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या शिवानीच्या हत्येप्रकरणी आरोपी अटकेत होते, ती शिवानी चक्क जिवंत होती. शिवानीने स्वतः पोलिस स्टेशन गाठून आपण सुखरूप असल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. पोलिस काय म्हणाले? या प्रकरणी पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “जळगावमध्ये आम्हाला माहिती मिळाली होती, मध्य प्रदेशमधील खकणार इथं एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. तिथे असं लक्षात आलं की, शिवानी नावाच्या मुलीचा तिच्या भाऊ आणि वडिलांनी खून केल्याची माहिती मिळाली. दोघांनी गुन्हाही कबूल केला होता. आता दोघांनी कबुली दिल्यामुळे दोघांना अटक केली. जळगावमध्ये ज्या अज्ञात महिलाचा मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. त्याचा डीएनए तपासणीसाठी दिला होता. अनोळखी महिलेचा ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. पण, खकणार पोलिस स्टेशनमधून पोलिस निरिक्षक अभिषेक जाधव यांचा आम्हाला फोन आला. सदरील प्रकरणामध्ये शिवानी बापूराव करमेकर ही जिवंत असल्याचं सांगितलं. त्या तरुणीला आम्ही पोलिस स्टेशनला बोलावलं आहे, तिचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपासा सुरू आहे.” तसंच, या प्रकरणामध्ये आरोपींनी दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून खोटी माहिती देत आले, पोलिस कोठडीत असताना आणि न्यायालयाामध्ये हजर केले असता त्यांनी खोटी माहिती दिली, आता याबद्दल तपास करत आहे’ असंही नितीन पाटील यांनी सांगितले. पोलिसांसमोर आव्हानांचा डोंगर या नाट्यमय वळणामुळे तपास यंत्रणेसमोर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर शिवानी जिवंत आहे, तर राजुरा जंगलात सापडलेला तो शिरविहीन मृतदेह कोणाचा? शिवानीच्या वडील आणि भावाने हत्येचा गुन्हा नसतानाही तो स्वतःच्या अंगावर का घेतला? आरोपींनी पहिल्या दिवसापासून न्यायालयात आणि पोलिस कोठडीत खोटी माहिती का दिली? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.