संजय राऊत यांना काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. 2019 ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांनी कोणासोबत लढल्या? राऊतांनी कोणासोबत प्रचार केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत तोंड फाटेपर्यंत राऊतांनी कौतुक केले होते. उद्धव ठाकरे 2019 ला भाजपसोबतच होते मग चोरलेल्या निवडणुकीचे तुम्ही भागीदार आहात का? असा खोचक सवाल भाजपच्या नवनाथ बन यांनी संजय राऊत यांना केला आहे. नवनाथ बन म्हणाले की, उबाठाने मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळावी म्हणून 2019 मध्ये भाजपच्या पाठित खंजीर खूपसण्याचे काम केले आणि काँग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे तुम्ही निवडणुकीवर बोलूच नये. काँग्रेसने यंत्रणेचा सर्वाधिक गैरवापर केला आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांची 12-12 तास चौकशी करण्यात आली आहे. तर अमित शहा यांना खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली तडीपार करण्यात आले होते. पण त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली नाही, उलट भाजप वाढवण्याचे काम केले. राऊतांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास नाही? नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा विश्वास राहिलेला नाही. आजपर्यंत ते म्हणत होते की उद्धव ठाकरेंनी मविआचे नेतृत्व करावे, ते आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत असे सांगत होते. आता ते शरद पवारांनी नेतृत्व करावे म्हणत आहे. ते कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? शरद पवारांनी या वयात नेतृत्व करावे म्हणतात म्हणजे उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कमकुवत आहे, म्हणून पवारांनी पुढाकार घ्यावा असे राऊत म्हणत आहेत. काँग्रेस मजबूत करण्यासाठी उबाठाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत का? ते उद्धव ठाकरेंना काँग्रेसचे हात बळकट करण्याचा सल्ला देणार आहेत का? असा टोला बन यांनी लगावला आहे. राऊतांचा खोटे बोलण्याचा विक्रम नवनाथ बन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशसेवा करण्याचा विक्रम केला आहे तर संजय राऊत यांच्यावर खोटे बोलण्याचा विक्रम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विक्रमावर खोटं बोलणाऱ्या राऊतांनी टीका करू नये. त्यांना केवळ खोटं बोलणेच जमते. नेहरुंनी काय केले काँग्रेसने काय केले हे देशातील जनतेला माहिती आहे, तुम्ही शिकवण्याची गरज नाही. भाजपने पक्ष फोडला नाही नवनाथ बन म्हणाले की, भाजपने कुठलाही पक्ष फोडलेला नाही. उबाठाला बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा पुढे नेता आली नाही म्हणून मुळ शिवसेना आपल्याकडे ठेवली. उलट राऊतांनी पक्ष फोडून तो काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचे काम केले. पूर्ण विचारसरणी सोडून राऊत काँग्रेसच्या दावणीला पक्ष बांधला. राष्ट्रवादी काँग्रेस मुळ पक्षसुद्धा आमच्यासोबत आहे.आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही.